Sunday, December 18, 2011

अण्णांच्या जनआंदोलनाने हादरले सरकार


अण्णा हजारे यांच्या भ्रष्ट्राचारविरोधी जनआंदोलनास मिळालेले व्यापक जनसमर्थन ही २०११ मधील ठळक घटना होय. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाने भारतीय समाजकारण व राजकारणात प्रचंड उपलथापालथ घडवूण आणली. या मुद्यावर संपूर्ण देश एकजूट झाला आणि जनभावनेच्या रेट्याने केंद्र सरकारला हादरून टाकले. देशवाशीयांसंबंधीत निर्णयात लोकविर्वाचित सरकारला जनतेला सहभागी करून घ्यावे लागेल. जनप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असून त्यांना जनहिताचेच निर्णय घ्यावे लागतील. घटनेनुसार संसद सर्वश्रेष्ठ असून कायदे बनवण्याचा अधिकार संसदेलाच आहे, यात दुमत नाही. मात्र लोकनिर्वाचित सरकारला संसदेत जनहिताचा अनादर करणारे कायदे बनवता येणार नाही, हे या आंदोलनाने रोखठोक बजावले. संसद ही नैतिकदृष्ट्या नागरिकांना जबाबदार आहे, हे ठसवून जनप्रतिनि व सरकारला कर्तव्याची आठवून करून देण्याचे काम या लोकलढ्याने केले. लोकशाही ही लोकांनी, लोकांची, लोकांसाठी चालवलेली व्यवस्था असून निर्वाचित सरकारला हुकुमशाहीकडे झुकता येणार नाही, अनिर्बंधपणे सत्ता उपभोगून जनतेचे हित दुलर्क्षिता येणार नाही, हे या लढ्याने राजकारण्यांचा ठणकावून सांगितले.

सरकारने मजबूत लोकपाल विधेयक आणावे यासाठी गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना एप्रिलमध्ये राजधानीत १३ दिवसांचे उपोषण करावे लागले. या अहिंसात्मक आंदोलनाची दखल जगभरात घेतल्या गेली. जगभरात त्याचे पडसाद उमटले. जगभरात पसरलेल्या भारतीयांनी या जनलढ्याच्या समर्थनार्थ धरणे धरली. गावापासून जागतिक पातळीपर्यंत जनाधार मिळालेले स्वातंत्र्यलढ्यानंतरचे हे पहिले आंदोलन असणार. जगभरातील प्रसारमाध्यमात या लढ्याचे पडसाद उमटले. ख्यातनाम आंतरराष्ट्रीय 'टाइम्स मॅगझिन'ने जगातील प्रमुख दहा घटनांमध्ये या जनआंदोलनास स्थान देवून जनलढ्यास ‍प्राप्त व्यापक जनसमर्थन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील व्यवस्थेप्रती नागरिकांमधील वाढता निराशावाद आणि आकांक्षेचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.

व्यापक जनसमर्थनाचे कारण
सामान्य व्यक्तिस हजार समस्यांतून तोंड वर काढायला वेळ नसताना समर्थनार्थ रस्त्यांवर जनसागर उतरण्याचे कारण केंद्र सरकारमधील मंत्री आणि नेत्यांचे एकापाठोपाठ उघडकीस आलेले कोट्यावधींचे घोटाळे आणि सामान्यजणांच्या आवाक्याबाहेर गेलेली महागाई होय. 'कॉमनवेल्थ' घोटाळ्यानंतर '२-जी स्पेक्ट्रम' उघडकीस आला आणि जनतेच्या पैशांची लयलूट सुरू असल्याचे स्पष्ट झाले. सरकारला जनतेच्या हिताशी देणेघेणे नसल्याची जनभावना यातून बळकट झाली. सरकार घोटाळे रोखू शकत नाही आणि महागाईही आवाक्यात आणू शकत नसल्याचे सरकार जनकल्याणाप्रती बेजबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. देशाच्या इतिहासात सरकारमधील मंत्री पहिल्यांदाच तिहार तुरूंगात गेले असणार. या अराजकसदृष्य वातावरणात जनक्षोभ खद्खदत होता. अण्णा आंदोलनाने त्यास व्यासपीठ मिळाले, रस्त्यांवरून घोषणाबाजीतून तो अभिव्यक्त झाला. सशक्त लोकपाल विधेयक आल्यास या कोंडीतून जनसामान्यांची सुटका होईल, अशी आशा यामुळे जागृत झाली. प्रस्थापित व्यवस्था आणि बेबंद सरकारविरूद्धच्या आक्रोशाने त्यास व्यापक जनलढ्याचे स्वरूप प्राप्त झाले.


प्रसारमाध्यमं आणि सोशल वेबसाइट्सची भूमिका
केंद्रातील सत्ताधारी सरकारने अण्णा आंदोलनाची प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेलं 'आभासी जनआंदोलन' म्हणून संभावना केली होती. खासकरून इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी घराघरातील टेलिव्हिजन संचावर सोयिस्कर मजकूर झळकावून आभासी आंदोनलन उभे केल्याचा त्यांचा होरा होता. मात्र अण्णांची उपोषणास्त्र उगारल्यानंतर हे फक्त अण्णांचे आंदोलन न राहता त्याने जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले. अण्णा फक्त त्याचा एक चेहरा होते. ते आभासी नसून वास्तव होते. सरकारच्या चूक लक्षात आली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती. जनमत सरकारविरोधात गेले होते. जनतेचा नैतिक पाठिंबा सरकारने कधीच गमावला होता. प्रचंड जनरेट्यासमोर सरकारला अक्षरश: गुडघे टेकावे लागले आणि लोकमताचा विजय झाला. जगातील सर्वात मोठी लोकशाही परिपक्व झाल्याचे यातून सिद्ध झाले. जिवंत लोकशाहीचे हे लक्षण आहे.

२०११ हे जगभरात जनक्रांतीचे वर्ष ठरले. जागतिक इतिहासात या वर्षाची जनआंदोलन आणि जनक्रांतीसाठी सुवर्णक्षरात नोंद होईल. शोशल वेबसाइट्सने यात अनन्यसाधारण भूमिका बजावली. जनआंदोलन आणि सोशल माध्यमं एकमेकांची पूरक ठरल्याचे आपण बघितले. सोशल वेबसाइट्स, ब्लॉग्स आणि एसएमएसच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात विचार, माहिती आणि संदेशांची देवाणघेवाण झाल्याने सुप्तपणे जनआंदोलनाची बीजे पेरल्या गेली. लोकशाहीत, हुकुमशाही किंवा कोणत्याच व्यवस्थेत सार्वजनिकरित्या जनजागृती, जनमंथनाचे मार्गात सरकारांनी अवरोध निर्माण केल्याने हे काम सोशल माध्यमातून होत आहे. अरब क्रांतीतही या माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अक्ष:रशा सरकारं उलथून टाकली आणि जनक्रांतीचे, जनआंदोलनाचे नवीनम माध्यम उदयास आले. म्हणूनच भारत सरकारने या माध्यमांचा धसका घेऊन प्रथम बल्क एसएमएसवर नियंत्रण आणल्यानंतर आता फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल वेबसाइट्सवर मजकूर प्रकाशनाबाबत नियंत्रण आणण्याची भाषा बोलत आहे. मात्र सरकारचे हे धोरण हुकुमशाही व दपडशाहीकडे झुकणारे असून लोकशाही व्यवस्थेत सरकारला अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर असली बंधने घालता येणार नाही. सरकारने नकारात्मक दृष्टिकोण सोडून जनआंदोलन, जनजागृती हे सशक्त आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानून या बदलांचे स्वागत करायला पाहिजे.

Saturday, December 17, 2011

विद्या बालन सर्वकष अभिनेत्री म्हणून स्थापित


विद्या बालन बोल्ड चित्रपटही करू शकते, कोणतीही भूमिका तितक्याच सक्षमपणे निभावू शकते आणि स्वतः:च्या भरवशावर चित्रपट हिट करू शकते, हे २०११ मध्ये सिद्ध झाले. 'डर्टी पिक्चर'ने तिकीट खिडकीवर अक्षरशः धूम घातली. समीक्षकांनी विद्याच्या भूमिकेची मुक्तकंठाने केली आणि विद्या सर्वकष अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये प्रस्थापित झाली ते २०११ मध्येच.

विद्या बालनने या चित्रपटात ९० च्या दशकातील बिनधास्त दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्कची बोल्ड भूमिका साकारली आहे. स्वोज्वळ, शालीन नायिकांच्या भूमिकात रंग भरणारी विद्या बोल्ड भूमिकेस न्याय देऊ शकेल काय, याबाबत क्षेत्रातील जाणकारांमध्ये साशंकता होती. कारण विद्याचे व्यक्तिमत्व या भूमिकेच्या अगदी विपरित आहे. तिचा चेहरा, डोळे, हावभाव, मृदू वाणी आणि एकंदर देहबोलीतील नाजूकता सर्वपरिचित आहे.याउलट मादकता, बेहोशी, बिनधास्तपणा हा सिल्क स्मिताचा स्थायिभाव. ही भूमिका साकारणे विद्यासाठी एक आव्हान होते. विद्याने अभिनयाप्रती समर्पित भाव आणि उपजत अभिनयक्षमतेच्या भरवशावर हे आवाहन अक्षरशः पेलत सर्वांना आवाक् केले.

बादल सरकार यांच्या 'परिणिता' चित्रपटातून विद्या पहिल्यांदा चित्रपटसृष्टित झळकली. यामध्येही तिची मध्यवर्ती भूमिका होती. या चित्रपटातील सशक्त अभिनयाने विद्याने लक्ष वेधून दखल घेण्यास भाग पाडले. विद्याचे दमदार आगमन झाले. मात्र वयाच्या दृष्टिने थोडे उशिरा आगमन झाल्याने तिच्याकडे कॉलेज तरूणीच्या भूमिका आल्या नाहीत. दमदार कथानकात चांगला अभिनय करणार्‍या अभिनेत्रीच्या साच्यातच ती राहिली. तिला चांगल्या दिग्दर्शकांनी संधी दिली मात्र आपल्याकडे नायिकाप्रधान चित्रपट विशेष निघत नसल्याने तिच्या अभिनयक्षमतेस विशेष वाव मिळत नव्हता. दरम्यान काही लहानमोठ्या व्यावसायिक चित्रपटांमधून ती झळकली.

कलाक्षेत्रात प्रतिभा व्यर्थ जात नाही हे नक्की. मणिरत्मन यांनी 'गुरू' चित्रपटात फिजिकली चॅलेंज्ड तरूणीची आव्हानात्मक भूमिकेसाठी तिची निवड केली. विद्याने व्हिलचेअरवर वावरणार्‍या तरूणीची भूमिका असी काही साकारली की ती खरोखरच त्या आजाराने ग्रस्त आहे. त्या भूमिकेतील तरूणीच्या इच्छा, आकांक्षा, प्रेम, चिड, असहाय्यता आणि जीवनाचा आनंद घेत जगण्याची दृढ इच्छांना तीने चेहर्‍यावरील हावभावातून अक्षरशः जीवंत केले. यानंतर 'पा' चित्रपटातून तीने फिजीकली चॅलेंज्ड मुलाच्या आईची भूमिका साकारली की ती त्या मुलाची खरोखरची आई भासली. विद्या भूमिकेत शिरून व्यक्तिरेखेशी एकरूप झाल्याने तिचा अभिनय सहज, सुंदर व नैसर्गिक वाटतो. पडद्यावर ती स्टार विद्या न वाटता व्यक्तिरेखेत वावरत असते.

विद्याने पहिल्यांदा बोल्ड व्यक्तिरेखा साकारली ती 'इश्किया' चित्रपटातून. संपर्कात आलेल्या पुरूषांना मोहात फासणार्‍या विधवा स्त्रिची भूमिका तीने यामधून साकारली होती. विद्याच्या या चित्रपटातील भूमिकेने तिकीट खिडकी गाजवली. समीक्षक आणि प्रेक्षकांना विद्या सशक्त अभिनय चांगलाच भावला. माउथ पल्बिसिटीने हा चित्रपट अनपेक्षितरित्या हिट झाला. यामध्ये तीने चुंबनदृष्यही केली होती.

मात्र आपली मादकता, बिनधास्तपणा आणि बोल्डपणामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत गाजवणारी, कंटेटच्या दृष्टिने दुय्यम चित्रपटा काम करून स्टारपद प्राप्त झालेल्या सिल्क स्मिताची भूमिका साकारणे धाडसी पाऊल होते. कारण या दशकात पडद्यावर तिची विश्वासार्हता भासवणे खडतर आव्हान होते. विद्याने ते धाडस केले. अभिनयक्षमतेस आव्हान देणार्‍या भूमिका साकारणे, प्रयोग करणे हीच एका सशक्त कलाकाराची कसोटी असते. विद्याने या सर्व कसोट्या पार पाडल्या आहेत. विद्या रॉक्स... उह्ह लाला...!

देव आनंद: जीवनतत्वज्ञानाची पाठशाळा



चार दशकं रूपेरी पडद्याला सोनेरी कडा देणार्‍या सदाबहार रोमँटीक सुपरस्टार देव आनंद यांच्या निघून जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील रोमँटीसिझमचा कालखंड संपृष्टात आला. भारतीय मन, अभी ना जाओ छोडके की दिल अभी भरा नही.. गुणगुणत असतानाच त्यांनी २०११ वर्षाच्या अखेर 'एक्झिट' घेतली.

देव साहेबांनी आयुष्यभर जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जगण्याचे तत्वज्ञान आपल्या जीवनशैलीतून घालून दिले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. जीवन हे अमुल्य असून प्रत्येक क्षण मौल्यवान असल्याने त्याचा सकारात्मक कंस्ट्रक्टीव्ह कामासाठी उपयोग करण्याचा धडा त्यांनी दिला. मोहमयी दुनियेत राहुनही भूतकाळात गुंतून न राहता वर्तमानात सतत नवनवीन प्रयोग करताना भविष्यकाळास आकार देत राहिले. देव साहेबांनी हिंदी चित्रपटसृष्टीला स्टायलीश, सळसळत्या तारूण्याचा वरदहस्त लाभलेला सकारात्मक नायक देऊन रूपेरी पडद्यास वार्धक्याची छाया पररण्यापासून वाचवले.

दिलीप-देव-राज ही हिंदी चित्रपटसृष्टीस प्राप्त झालेली तीन रत्न होतं. त्यांनी अमूर्त छाप सोडताना कलात्मक माध्यमाच्या हाताळणीचे नवनवे प्रयोग करून एक कालखंड घडवला. तिघांनीही अभिनयाच्या भिन्न शैली प्रस्थापित केल्या. दिलीप साहेबांनी ट्रॅडेजी किंग रंगवला, राज कपूरने साळा-भोळा नायक प्रस्थापित केला तर देवने स्मार्ट, स्टायलीश नायक या चित्रपटसृष्टीस बहाल केला. देव आनंद निराशावादी भूमिकांपासून नेहमी दूर राहिले. गाता रहे मेरा दिल...म्हणत त्यांनी सकारात्मक जगताना जीवनास नवीन दृष्टी देणार्‍या भूमिकाच साकारल्या आणि प्रत्यक्ष जीवनातही त्यांनी हेच तत्वज्ञान पाळले. अमृत प्राप्त झालेल्या या नायकाच्या चेहर्‍यावर कधी सुरकत्या पडलेल्या प्रेक्षकांनी पाहिल्या नाहीत. ते भरभरून जीवनरस प्यायले आणि भारतीयांसाठीही त्याचे कुंड भरून ठेवले. त्यांनी प्रेक्षकांना पर्याय दिले आणि निवडीचा निर्णय दर्शकांवर सोडून दिला.

स्वत:च्या जीवनतत्वज्ञानावर त्यांचा अढळ विश्वास होता आणि तो ८८ वर्षाच्या जीवनप्रवासात कधीही ढळला नाही. वाटेत कित्येक वळणं आली असतील मात्र त्यांची वाट चुकली नाही. हेतुपरस्पर दुर्लक्ष करत तो चालत राहिला. जीवनप्रवास हा अखंड चालणारा कालप्रवाह असून तो कधीही थांबत नाही, तो अखंडीत आहे, हेत त्याने सांगितले. आपणास प्राप्त झालेले जीवन खूप छोटे असून ते व्यर्थ घालवणे इष्ट नाही.

सतत चालत राहून, व्यग्र राहून, प्रत्येक क्षणाचा सवौच्च उपयोग घ्यायचा, प्रत्येक क्षण अनुभवायचा, हेच त्यांनी सांगितले. हे जग, ही मोहमयी दुनिया, कारकीर्दीतले महान चित्रपट हे खूप सुंदर आहे मात्र मला येथेच थांबता येणार नाही, याहीपलीकडे आणखी खूप काही आहे, त्याचा शोध मला घ्यायचा आहे. जीवनाला दिलेलं वचनं मला निभवायच आहे,मला शेवटचा श्वास घेण्याअगोदर खूप दूर जायचे आहे, हेच देव साहेबांनी प्रत्येक गोष्टीतून सांगितले. रॉबर्ट फ्रॉस्टने आपल्या कवीतेतून हे तत्वज्ञान सहज, सुंदर ओळीतून शब्दबद्ध केले आहे...

The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.