Friday, April 16, 2010

फ्रॉम द जर्नालिस्ट पर्सनल डायरी

टक.. टक.. टक.. दारावर वर्तमान पत्र टाकणारा मुलगा. सुरेशची साखर झोप अजूनही संपलेली नाही. झोपेतच... वैताग! पोरगं दारावरून हटायला तयार नाही. सुरेश नाराजीनेच बिछान्यातून उठून काय रे.. आ? पोरगं घाबरत, 'साहेब बील पायजे होत! ' सुरेशने पँटच्या खिशातून पैसे काढून बील चुकत केलं. सुरेशने पेपरवर नजर टाकली. पहिल्या पानावरील बातम्या वाचून झाल्यावर थेट शहर पानावर. स्वतःच्या बातमी सोबत लगेच इतर रिर्पोटर्सनी केलेल्या बातमीची तुलना. जनरल बातम्या झाल्यावर मग विशेष बातम्या. झकास!.. महानगरपालिकेतील सुरशने काढलेली जमीन घोटाळ्याची बातमी पहिल्या पानावर. तेही फक्त आपल्याच वर्तमानपत्रात.

ख़ास बातम्यांच्या बाबतीत शुरेशचा हातखंडा. शुरेशने अवघ्या तीन वर्षाच्या पत्रकारितेतील कारकीर्दीत आपले नेटवर्क तयार केले होते. इतर रिर्पोटर्सना बातमीची कुणकूण लागायच्या अगोदर सुरेश बातमी छापून तयार. वैताग झटकून आंघोळ उरकली. गाडीला जोरात किक मारली अन चाक गरगरा फिरायला लागली. ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यनारायनाने भर सकाळी आग ओकायला सुरूवात केली होती. सुरेशला ऊन्हाचा मोठा वैताग. रिर्पोटरचे काम म्हटले की फिरणे आलेच. सुरेशच्या मते पावसाळ्यात एकदाचा रेनकोट घालता येणार परंतु ऊन्हाच काय? दुपट्टा गुंडाळला तर केसांचा वैताग. नाही गुंडाळला तर ऊन लागण्याची भीती.

विचारचक्र सुरू असतानाच गंजूच्या टपरीसमोर गाडीचे कचकन ब्रेक लागून चाक फिरायची थांबली. गजू पानावर चुना लावता-लावता नमस्कार सुरेश साहेब! सुरेश, ' नमस्कार.. आजच पान रंगायला पाहिजे'. रंगणार की साहेब. बातमी लय झकास आलीय म्हटलं. गजू व सुरेश यांच्यात थोडावेळ त्यांच्या सांकेतिक भाषेत बोलचाल झाली अन सरेशने गाडीची किक मारताच चाके फिरायला लागली. गाडीची चाकं पार्किंगमध्ये थांबली अन सुरेशने टेलिफोनचा ताबा घेतला. टेलिफोनची रिंग घरघरू लागली. कुठे, काय, कस, केव्हा, का? उरकले. चमत्कार, नमस्कार झाले. मग साहेब, आज यायचं काय? काय रामभाऊ साहेब काय म्हणतायत! इत्यादी संपलंय. याला सुरेश राउंड म्हणतोय. सतर्क पत्रकारिता करायची झाल्यास किमान दोनदा राउंड घ्यायलाच पाहिजे, हा सुरेशचा दंडक. ऋतू बदलले, वर्ष गेलीत पण सुरेशची पत्रकारितेची बाराखडी बदलणार नाही.

पाचदहा फिडबॅकचे कॉल घेऊन झाले. बातमी बद्दलच्या प्रतिक्रियाही आटोपल्या. बरेच ऊन-पावसाळे निघून गेल्याने सुरेशला याचे रट्टे-घट्टे पडले होते. संपादक साहेबासोबतची बैठक आटोपली. तोपर्यंत जेवणाचा डबा आला. न्याहारी उरकली. सुरेशने दैनंदिन डायरीतील नोंदी डोळ्याखालून घातल्या. काही टिपणं काढली. गाडीला किक मारताच चाके फिरायला लागली. महानगरपालिकेचा पार्किंगमध्ये चाके थांबली. पत्रकार दालनात पोहचेपर्यंत शंभरेक नमस्कार चमत्कार झाले. महापौर, आयुक्तांची भेट- गाठ झाली. विरोधीपक्ष नेतेही भेटले. इतर पत्रकार मंडळीशी पत्रकार दालनात रोजच्या प्रमाणे मुक्त फटकेबाजी झाली.
सगळ्यांना बीट करून शहरातील प्रमुख घोटाळ्याची बातमी छापल्याने इंप्रेशन एकदम टाईट. परंतु सुरेश माणूस एकदम दिलदार मनाचा. बोलायला मनमोकळा. दोस्तांचा दोस्त. अभिजितने मधातच पिलू सोडलं, 'मग सुरेश आज कोठे बसायचं? सुरेश वैतागला. सालं बसनं, अन फालतू चकाट्या मारत ढोसणं, याचा त्याला आता वैताग यायला लागला होता.

सुरूवातीला सुरेशलाही मजा यायची. सुरेशचे आता राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या मातब्बर लोकांमध्ये बसनं-उठणं होतं. तीन वर्षाच्या अथक प्रयत्नातून त्याने स्वत:ला पत्रकारितेत प्रस्थापित केलं होत. नावं कमावलं होत. शालेय जीवनापासून चालू ठेवलेल्या वाचनात त्याने आजही खंड पडू दिला नव्हता. त्यामुळे त्याला चांगली बैठक प्राप्त झाली होती.

महानगरपालिकेची विधायक कामे, भ्रष्टाचार व राजकीय गटबाजीचे विश्लेषणात्मक व शोध पत्रकारितेचा पाया असणारे वार्ताकन तो करायचाच. यासोबतच सांस्कृतिक प्रांतातील सर्जनशीलतेला वाव असणार लेखनही तो करायचा. सुरेश कलात्मक अभिरूची जोपासणारा माणूस. संगीत, नाटक, साहित्य यात त्यास विशेष रूची. कलात्मक व दर्जेदार कलाकृतींचा त्याच्या संग्रहात समावेश नाही असं कधी झालं नाही. चौफेर वाचन, कलात्मकता जोपासणारा स्वभाव व आडव्या उभ्या क्षेत्रात असणारा त्याचा परिचय, मैत्री यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वात परिपक्वता आली होती. आपणं मिळविलेली पत, प्रतिष्ठा याला गालबोट लागू नये, यासाठी त्याने जपायला सुरूवात केली होती. अनंतानेर, काय सुरेश कसला विचार करतोस यार? असे म्हणत खांद्यावर हात ठेवल्यावर त्याची विचारचक्र थांबली. झपाझप पायऱ्या उतरून सुरेश पार्किंगमध्ये आला अन गाडीला किक बसली. चाके गरगरा फिरायला लागली. ऑफिसमध्ये येऊन त्याने कॉपी टाईप केल्या. बातमी सोडून थेट रूमवर.

नुकत्याच गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेल्या होम थियटरवर त्याने मस्त जगजीत सिंग लावला. गझलचे सुरेल, मंद स्वर वातावरणात पसरल्यावर स्लिपवेलच्या गादीवर पडून तो कॉलेजच्या आठवणीत रंगला. दररोजच्या वैतागापासून आज त्याला निवांत क्षण मिळाले होते. तीन वर्षाअगोदर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व पत्राकरिता विभागात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात महाराष्ट्रातील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांच्या संपादकांसोबत संवाद साधण्याची संधी त्याला मिळाली होती. विद्यार्थ्यामधून सुरेशने महाराष्ट्रातील राजकीय व सांस्कृतिक चळवळीवर केलेल्या विश्लेषणात्मक व तार्किक कसोटीवर टिकणाऱ्या भाषणाने झालेला कौतुकाचा वर्षाव त्यास आजही आठवतो. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात, 'सुरेश ग्रेट, एक्सलंट! हे विभाग प्रमुख व संपादकांचे शब्द आजही त्याला प्रेरणा देतात.

कविता, सुधीर, प्रवीण, केतकी यांच्या घोळक्यात रमेशच्या कँटिनवर चहाचे फुरके मारताना गरम, चुरचुरीत कांदा भजी खाताना केतकीने त्याला सार्वजनिकरीत्या प्रपोज केले होते. 'आय लव्ह यू अँड वूड लाइक टू बी विथ टू फॉरएव्हर! या शब्दांनी सुरेश एकदम चाट पडला होता. मैत्री वगैरे ठीक पण प्रेम वगैरे म्हणजे वैतागच, हे समीकरण त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेलं होत. सुरेश, 'सॉरी केतकी, अँट धीझ क्रुशीयल स्टेज आय हॅव नो टाइम फॉर लव्ह. माय फर्स्ट प्रायऑरिटी इज जर्नालिझम! केतकी, 'सुरेश आय नो दॅट यूर आर टू पॅशनेट अबाउट जर्नालीझम. बट डू नॉट कंफ्यूज प्रोफेशन विथ पर्सनल लाईफ अँड एमोशन्स. वैताग. सुरेश वैतागला. आता प्रवीण, कविता व सुधीरही चालू होणार व यांना कनव्हींस करणे शक्य नाही हे त्याला माहिती होते.

सुरेश सरळ पार्किंगमध्ये, अन गाडीस जोरात किक. चाकांसोबतच विचार चक्रही गरगरा फिरायला लागली. वेताळ टेकडीच्या पायथ्याही ब्रेक लागताच चाके थांबली. टेकडीवर हवसे, नवसे, गवसे सर्वच फिरायला येत असतात. प्रत्येकाच्या जागाही ठरलेल्या. सुरेश सर्व वैताग पार करून सर्वात उंच भागावर जाऊन बसला. संध्याकाळ झाली होती. आल्हाददायक हवा अंगाला स्पर्शून जात होती. संपूर्ण शहराचे मनमोहक दर्शन येथून व्हायचे. सगळीकडे दिवे लागल्याने शहर प्रकाशात न्हाऊन निघाले होते. इतर वेळेस प्रचंड ट्रॅफिक, आवाज व पोलुशनमुळे वैताग देणारे रस्ते शांत, शिस्तबद्ध भासत होते. मिणमिणते दिवे घेऊन गाड्या ये जा करीत होत्या. वैताग घालविण्यासाठी सुरेशचे हे फेमस ठिकाण होते. येथे कोणीही फुकटचा सल्ला देणार नाही किंवा शहाणपण शिकविणारं नाही. डिस्टर्ब करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Thursday, April 1, 2010

इट्स स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहा!

इंडियन प्रिमियर लिगचे सामने बघताना २० षटकांचा खेळ पूर्ण होण्याअगोदरच 'स्ट्रॅटेजिक टाइमआउट' मध्ये, फलंदाज बाद झाल्याबरोबर किंवा कोणतीही संधी मिळताक्षणी होणाऱ्या जाहिरातींच्या भडिमाराने आपण त्रस्त झाला असणार. अस्सल क्रिकेट बहाद्दर, शौकीन आणि एखाद्या संघाचे समर्थक असणाऱ्या प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे काम मधातच घुसडण्यात आलेल्या या जाहिराती करत असतात.

क्रिकेटच्या व्यावसायिकरणासोबतच खेळास एंटरटेनमेंट इव्हेंट बनवण्याची कास आयोजकांनी हाती घेतली आहे हे जाणत्या चाहत्यांच्या लक्षात आलेच असणार. चार तास खच्चून मनोरंजनासाठी मैदानावरील तडाखेबंद फटकेबाजीसोबतच, प्रेक्षकांच्या दिमतीस चीअरलीडर्स आहेतच. बहारदार फटक्यांनी चाहत्यांना खिळवून ठेवण्याची जबाबदारी क्रिकेटपटूंना देण्यात आली आहे. तर प्रेक्षकांना लयबद्ध हालचालींनी घायाळ करण्याचे काम हे चीअरलीडर्सचे.


महामहीम ललित मोदींच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या या लीग स्पर्धेने मिळकतीची कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन भाबड्या चाहत्यांना अगोदरच अवाक केले आहेत. आयोजक, प्रायोजक, संघमालक, खेळाडू, ब्रॉडकास्टर सगळ्यांना खोऱ्याने पैसा ओढण्याचा एककलमी कार्यक्रम ठरवून देण्यात आलेला आहे. मात्र हे सामने बघण्यासाठी टीव्हीसमोर डोळे फोडणारा किंवा हौसेने मैदानावर जाऊन सामने बघणारा प्रेक्षक यापासून वंचितच, त्याने फक्त खिसा हलका करायचा. हा अजबच न्याय झाला राव नाही का?


२०-२० षटकांच्या सामन्यादरम्यान चौफेर फटकेबाजीच्या आतिषबाजीतच मध्येच डोकावणाऱ्या जाहिरातीही रंग उधळत असतात. ब्रेक मध्ये जाहिरातींचे डोकावणे हक्काचेच झाले आहे, मात्र गडी बाद झाला की... चेंडू हरवला की... कुणास दुखापत झाली की... कधीही घुसडणं जरा अतीच झाली. मग क्रिकेट सामना आणि एखाद्या चॅनेलवरचा हिट चित्रपट पाहण्यात फरक काय? असा प्रश्न आपणांस पडला असणारच. क्रिकेटचे एंटरटेनमेंट इव्हेंटमध्ये झालेल्या रूपांतरातच त्याचे गमक आहे.

'अतुल्य' अभिनेता

मराठी नाट्यसृष्टीतून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारया अतुल कुलकर्णी या गुणी व सर्जनशील अभिनेत्याने अगदी थोड्या कालावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला आहे. हे राम, पेज थ्री, चांदनी बार, दम या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षक व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

तब्बल दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून अभिनयाची पावती मिळवली आहे. अभ्यासू अभिनेता अशी ओळख असलेल्या अतुलला आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका करायला आवडतात. त्यामुळे चाकोरीबाहेरचा अभिनेता अशी त्याची ओळख आहे. अतुलचा जन्म बेळगावचा. त्याचे शिक्षण झाले ते सोलापूरात.

शिक्षणात अतुलची गती साधारणच होती. म्हणजे सांगायचं झालंच तर बारावीला तो दोनदा परीक्षेला बसला आणि त्यानंतर अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाची परीक्षा त्याला तीनदा द्यावी लागली. मग त्यानंतर त्याने आपल्या अंतर्मनाला साद देत आपला कौल असलेल्या कला क्षेत्रात शिक्षण घेण्याचे नक्की केले.
त्यासाठी पुन्हा सोलापूरात आला.

इंग्रजी साहित्य घेऊन त्याने पदवी घेतली. इंग्रजी साह्त्यि वाचनाने त्यांच्या सृजनाला, अभिव्यक्तीस वाट मिळाली अन जाणीवा समृद्ध होत गेल्या. याच काळात तो नाटकांशीही जोडला गेला. सोलापूरच्या नाट्य आराधना या ग्रूपबरोबर काम करायला सुरवात केली. सुरवातीला दोन वर्षे तर पडद्यामागचा कलाकार होता.

नंतर त्याला स्टेजवर येण्याची संधी मिळाली आणि नंतर मिळतच राहिली. आता त्याने या क्षेत्राचा गंभीरपणे विचार सुरू केला आणि त्यासाठी शास्त्रसुद्ध शिक्षण घेण्याची आवश्यकता भासू लागली. मग त्याने दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात' प्रवेश घेतला. तेथे त्याला मार्गदर्शन मिळाले ते नसरूद्दीन शहा, रतन थिय्यम आदी मान्यवरांचे. येथेच त्याच्या गुणवत्तेला पैलू पडले. त्याच्यातला कलाकार बाहेर आला.

एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर त्याने पहिले व्यावसायिक नाटक केले ते देवदास व गांधींजींमधील संघर्ष मांडणारे गांधी विरूद्ध गांधी. यात त्याने गांधीजींची भूमिका केली. अतुलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हे नाटक हिंदी व गुजरातीतही झाले. तेथेही ते कौतुकास पात्र ठरले. त्याच्या भूमिकेला गुजरात सरकारचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर एडससंदर्भात माहिती देणारे 'क्रॉसरोडस तसेच मृच्छकटिकम, रतन थिय्यम दिग्दर्शित 'थंबानालू, गिरीश कर्नाड लिखित 'अंजु मलिगे' ही काही नाटके केली. ही सर्व नाटके वेगळ्या प्रकारची आहेत.

सद्या अतुल गुलजार यांच्या कवितांवर आधारीत 'खराशे' चे प्रयोग करतो आहे. मराठी चित्रपटांमधल्या त्याच्या भूमिकाही वेगळ्या आहेत. 'देवराई' चित्रपटात त्यांनी साकारलेली स्किझोफ्रेनिक पात्राची भूमिका दाद मिळवून गेली. 'चकवा, दहावी फ, वास्तुपूरष, नटरंग हे त्याचे अन्य काही चित्रपट. अतुल खर्‍या अर्थाने ओळखला जाऊ लागला तो हिंदी चित्रपटांमुळे.

कमल हासनच्या 'हे राम' मधील अभ्यंकर या पात्रातील अभिनयानेच त्याने चुणूक दाखवली होती. त्याचे फळही त्याला सहाय्यक अभिनेत्यासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने मिळाले. त्यानंतर मग 'चांदनी बार, पेज थ्री, खाकी, ८८ अँटॉप हिल, सत्ता, दम' या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचेही कौतुक झाले.

शिवाय त्याने काही इतर भाषक म्हणजे इंग्रजी, तेलगू, कन्नड चित्रपटातही काम केले आहे. त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कलाकार हा नेहमी स्वतच्या अभिव्यक्तीबाबत असमाधानी असतो. पूर्णत्वासाठी त्याचा स्वतःशीच संवाद सुरू असतो. आपण रंगविलेल्या पात्रांचा अभ्यास करीत कच्चे दुवे हेरून त्याला पूर्णत्व देतानाच कलेच्या अभिव्यक्तीबाबत विविध प्रयोग करीत असतो.

अतुलला हे सारे तंतोतंग लागू पडते. त्यासाठी त्यांनी रंगभूमीशी आपले नाते आजही कायम ठेवले आहे. अतुल केवळ अभिनेता नाही, तर त्याच्यात एक संवेदनक्षम माणूसही दडला आहे. म्हणून नर्मदा बचाव आंदोलनासंदर्भात विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे यासाठी मेधा पाटकरांनी दिल्लीत आंदोलन केले होते. त्यावेळी तेथेच असणाऱ्या आमीर खान व अतुल कुलकर्णी या कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला होता व त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्यानंतरही तो आपल्या भूमिकेशी ठाम होता.