Sunday, December 18, 2011

अण्णांच्या जनआंदोलनाने हादरले सरकार


अण्णा हजारे यांच्या भ्रष्ट्राचारविरोधी जनआंदोलनास मिळालेले व्यापक जनसमर्थन ही २०११ मधील ठळक घटना होय. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाने भारतीय समाजकारण व राजकारणात प्रचंड उपलथापालथ घडवूण आणली. या मुद्यावर संपूर्ण देश एकजूट झाला आणि जनभावनेच्या रेट्याने केंद्र सरकारला हादरून टाकले. देशवाशीयांसंबंधीत निर्णयात लोकविर्वाचित सरकारला जनतेला सहभागी करून घ्यावे लागेल. जनप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असून त्यांना जनहिताचेच निर्णय घ्यावे लागतील. घटनेनुसार संसद सर्वश्रेष्ठ असून कायदे बनवण्याचा अधिकार संसदेलाच आहे, यात दुमत नाही. मात्र लोकनिर्वाचित सरकारला संसदेत जनहिताचा अनादर करणारे कायदे बनवता येणार नाही, हे या आंदोलनाने रोखठोक बजावले. संसद ही नैतिकदृष्ट्या नागरिकांना जबाबदार आहे, हे ठसवून जनप्रतिनि व सरकारला कर्तव्याची आठवून करून देण्याचे काम या लोकलढ्याने केले. लोकशाही ही लोकांनी, लोकांची, लोकांसाठी चालवलेली व्यवस्था असून निर्वाचित सरकारला हुकुमशाहीकडे झुकता येणार नाही, अनिर्बंधपणे सत्ता उपभोगून जनतेचे हित दुलर्क्षिता येणार नाही, हे या लढ्याने राजकारण्यांचा ठणकावून सांगितले.

सरकारने मजबूत लोकपाल विधेयक आणावे यासाठी गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना एप्रिलमध्ये राजधानीत १३ दिवसांचे उपोषण करावे लागले. या अहिंसात्मक आंदोलनाची दखल जगभरात घेतल्या गेली. जगभरात त्याचे पडसाद उमटले. जगभरात पसरलेल्या भारतीयांनी या जनलढ्याच्या समर्थनार्थ धरणे धरली. गावापासून जागतिक पातळीपर्यंत जनाधार मिळालेले स्वातंत्र्यलढ्यानंतरचे हे पहिले आंदोलन असणार. जगभरातील प्रसारमाध्यमात या लढ्याचे पडसाद उमटले. ख्यातनाम आंतरराष्ट्रीय 'टाइम्स मॅगझिन'ने जगातील प्रमुख दहा घटनांमध्ये या जनआंदोलनास स्थान देवून जनलढ्यास ‍प्राप्त व्यापक जनसमर्थन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील व्यवस्थेप्रती नागरिकांमधील वाढता निराशावाद आणि आकांक्षेचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.

व्यापक जनसमर्थनाचे कारण
सामान्य व्यक्तिस हजार समस्यांतून तोंड वर काढायला वेळ नसताना समर्थनार्थ रस्त्यांवर जनसागर उतरण्याचे कारण केंद्र सरकारमधील मंत्री आणि नेत्यांचे एकापाठोपाठ उघडकीस आलेले कोट्यावधींचे घोटाळे आणि सामान्यजणांच्या आवाक्याबाहेर गेलेली महागाई होय. 'कॉमनवेल्थ' घोटाळ्यानंतर '२-जी स्पेक्ट्रम' उघडकीस आला आणि जनतेच्या पैशांची लयलूट सुरू असल्याचे स्पष्ट झाले. सरकारला जनतेच्या हिताशी देणेघेणे नसल्याची जनभावना यातून बळकट झाली. सरकार घोटाळे रोखू शकत नाही आणि महागाईही आवाक्यात आणू शकत नसल्याचे सरकार जनकल्याणाप्रती बेजबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. देशाच्या इतिहासात सरकारमधील मंत्री पहिल्यांदाच तिहार तुरूंगात गेले असणार. या अराजकसदृष्य वातावरणात जनक्षोभ खद्खदत होता. अण्णा आंदोलनाने त्यास व्यासपीठ मिळाले, रस्त्यांवरून घोषणाबाजीतून तो अभिव्यक्त झाला. सशक्त लोकपाल विधेयक आल्यास या कोंडीतून जनसामान्यांची सुटका होईल, अशी आशा यामुळे जागृत झाली. प्रस्थापित व्यवस्था आणि बेबंद सरकारविरूद्धच्या आक्रोशाने त्यास व्यापक जनलढ्याचे स्वरूप प्राप्त झाले.


प्रसारमाध्यमं आणि सोशल वेबसाइट्सची भूमिका
केंद्रातील सत्ताधारी सरकारने अण्णा आंदोलनाची प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेलं 'आभासी जनआंदोलन' म्हणून संभावना केली होती. खासकरून इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी घराघरातील टेलिव्हिजन संचावर सोयिस्कर मजकूर झळकावून आभासी आंदोनलन उभे केल्याचा त्यांचा होरा होता. मात्र अण्णांची उपोषणास्त्र उगारल्यानंतर हे फक्त अण्णांचे आंदोलन न राहता त्याने जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले. अण्णा फक्त त्याचा एक चेहरा होते. ते आभासी नसून वास्तव होते. सरकारच्या चूक लक्षात आली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती. जनमत सरकारविरोधात गेले होते. जनतेचा नैतिक पाठिंबा सरकारने कधीच गमावला होता. प्रचंड जनरेट्यासमोर सरकारला अक्षरश: गुडघे टेकावे लागले आणि लोकमताचा विजय झाला. जगातील सर्वात मोठी लोकशाही परिपक्व झाल्याचे यातून सिद्ध झाले. जिवंत लोकशाहीचे हे लक्षण आहे.

२०११ हे जगभरात जनक्रांतीचे वर्ष ठरले. जागतिक इतिहासात या वर्षाची जनआंदोलन आणि जनक्रांतीसाठी सुवर्णक्षरात नोंद होईल. शोशल वेबसाइट्सने यात अनन्यसाधारण भूमिका बजावली. जनआंदोलन आणि सोशल माध्यमं एकमेकांची पूरक ठरल्याचे आपण बघितले. सोशल वेबसाइट्स, ब्लॉग्स आणि एसएमएसच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात विचार, माहिती आणि संदेशांची देवाणघेवाण झाल्याने सुप्तपणे जनआंदोलनाची बीजे पेरल्या गेली. लोकशाहीत, हुकुमशाही किंवा कोणत्याच व्यवस्थेत सार्वजनिकरित्या जनजागृती, जनमंथनाचे मार्गात सरकारांनी अवरोध निर्माण केल्याने हे काम सोशल माध्यमातून होत आहे. अरब क्रांतीतही या माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अक्ष:रशा सरकारं उलथून टाकली आणि जनक्रांतीचे, जनआंदोलनाचे नवीनम माध्यम उदयास आले. म्हणूनच भारत सरकारने या माध्यमांचा धसका घेऊन प्रथम बल्क एसएमएसवर नियंत्रण आणल्यानंतर आता फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल वेबसाइट्सवर मजकूर प्रकाशनाबाबत नियंत्रण आणण्याची भाषा बोलत आहे. मात्र सरकारचे हे धोरण हुकुमशाही व दपडशाहीकडे झुकणारे असून लोकशाही व्यवस्थेत सरकारला अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर असली बंधने घालता येणार नाही. सरकारने नकारात्मक दृष्टिकोण सोडून जनआंदोलन, जनजागृती हे सशक्त आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानून या बदलांचे स्वागत करायला पाहिजे.

Saturday, December 17, 2011

विद्या बालन सर्वकष अभिनेत्री म्हणून स्थापित


विद्या बालन बोल्ड चित्रपटही करू शकते, कोणतीही भूमिका तितक्याच सक्षमपणे निभावू शकते आणि स्वतः:च्या भरवशावर चित्रपट हिट करू शकते, हे २०११ मध्ये सिद्ध झाले. 'डर्टी पिक्चर'ने तिकीट खिडकीवर अक्षरशः धूम घातली. समीक्षकांनी विद्याच्या भूमिकेची मुक्तकंठाने केली आणि विद्या सर्वकष अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये प्रस्थापित झाली ते २०११ मध्येच.

विद्या बालनने या चित्रपटात ९० च्या दशकातील बिनधास्त दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्कची बोल्ड भूमिका साकारली आहे. स्वोज्वळ, शालीन नायिकांच्या भूमिकात रंग भरणारी विद्या बोल्ड भूमिकेस न्याय देऊ शकेल काय, याबाबत क्षेत्रातील जाणकारांमध्ये साशंकता होती. कारण विद्याचे व्यक्तिमत्व या भूमिकेच्या अगदी विपरित आहे. तिचा चेहरा, डोळे, हावभाव, मृदू वाणी आणि एकंदर देहबोलीतील नाजूकता सर्वपरिचित आहे.याउलट मादकता, बेहोशी, बिनधास्तपणा हा सिल्क स्मिताचा स्थायिभाव. ही भूमिका साकारणे विद्यासाठी एक आव्हान होते. विद्याने अभिनयाप्रती समर्पित भाव आणि उपजत अभिनयक्षमतेच्या भरवशावर हे आवाहन अक्षरशः पेलत सर्वांना आवाक् केले.

बादल सरकार यांच्या 'परिणिता' चित्रपटातून विद्या पहिल्यांदा चित्रपटसृष्टित झळकली. यामध्येही तिची मध्यवर्ती भूमिका होती. या चित्रपटातील सशक्त अभिनयाने विद्याने लक्ष वेधून दखल घेण्यास भाग पाडले. विद्याचे दमदार आगमन झाले. मात्र वयाच्या दृष्टिने थोडे उशिरा आगमन झाल्याने तिच्याकडे कॉलेज तरूणीच्या भूमिका आल्या नाहीत. दमदार कथानकात चांगला अभिनय करणार्‍या अभिनेत्रीच्या साच्यातच ती राहिली. तिला चांगल्या दिग्दर्शकांनी संधी दिली मात्र आपल्याकडे नायिकाप्रधान चित्रपट विशेष निघत नसल्याने तिच्या अभिनयक्षमतेस विशेष वाव मिळत नव्हता. दरम्यान काही लहानमोठ्या व्यावसायिक चित्रपटांमधून ती झळकली.

कलाक्षेत्रात प्रतिभा व्यर्थ जात नाही हे नक्की. मणिरत्मन यांनी 'गुरू' चित्रपटात फिजिकली चॅलेंज्ड तरूणीची आव्हानात्मक भूमिकेसाठी तिची निवड केली. विद्याने व्हिलचेअरवर वावरणार्‍या तरूणीची भूमिका असी काही साकारली की ती खरोखरच त्या आजाराने ग्रस्त आहे. त्या भूमिकेतील तरूणीच्या इच्छा, आकांक्षा, प्रेम, चिड, असहाय्यता आणि जीवनाचा आनंद घेत जगण्याची दृढ इच्छांना तीने चेहर्‍यावरील हावभावातून अक्षरशः जीवंत केले. यानंतर 'पा' चित्रपटातून तीने फिजीकली चॅलेंज्ड मुलाच्या आईची भूमिका साकारली की ती त्या मुलाची खरोखरची आई भासली. विद्या भूमिकेत शिरून व्यक्तिरेखेशी एकरूप झाल्याने तिचा अभिनय सहज, सुंदर व नैसर्गिक वाटतो. पडद्यावर ती स्टार विद्या न वाटता व्यक्तिरेखेत वावरत असते.

विद्याने पहिल्यांदा बोल्ड व्यक्तिरेखा साकारली ती 'इश्किया' चित्रपटातून. संपर्कात आलेल्या पुरूषांना मोहात फासणार्‍या विधवा स्त्रिची भूमिका तीने यामधून साकारली होती. विद्याच्या या चित्रपटातील भूमिकेने तिकीट खिडकी गाजवली. समीक्षक आणि प्रेक्षकांना विद्या सशक्त अभिनय चांगलाच भावला. माउथ पल्बिसिटीने हा चित्रपट अनपेक्षितरित्या हिट झाला. यामध्ये तीने चुंबनदृष्यही केली होती.

मात्र आपली मादकता, बिनधास्तपणा आणि बोल्डपणामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत गाजवणारी, कंटेटच्या दृष्टिने दुय्यम चित्रपटा काम करून स्टारपद प्राप्त झालेल्या सिल्क स्मिताची भूमिका साकारणे धाडसी पाऊल होते. कारण या दशकात पडद्यावर तिची विश्वासार्हता भासवणे खडतर आव्हान होते. विद्याने ते धाडस केले. अभिनयक्षमतेस आव्हान देणार्‍या भूमिका साकारणे, प्रयोग करणे हीच एका सशक्त कलाकाराची कसोटी असते. विद्याने या सर्व कसोट्या पार पाडल्या आहेत. विद्या रॉक्स... उह्ह लाला...!

देव आनंद: जीवनतत्वज्ञानाची पाठशाळा



चार दशकं रूपेरी पडद्याला सोनेरी कडा देणार्‍या सदाबहार रोमँटीक सुपरस्टार देव आनंद यांच्या निघून जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील रोमँटीसिझमचा कालखंड संपृष्टात आला. भारतीय मन, अभी ना जाओ छोडके की दिल अभी भरा नही.. गुणगुणत असतानाच त्यांनी २०११ वर्षाच्या अखेर 'एक्झिट' घेतली.

देव साहेबांनी आयुष्यभर जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जगण्याचे तत्वज्ञान आपल्या जीवनशैलीतून घालून दिले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. जीवन हे अमुल्य असून प्रत्येक क्षण मौल्यवान असल्याने त्याचा सकारात्मक कंस्ट्रक्टीव्ह कामासाठी उपयोग करण्याचा धडा त्यांनी दिला. मोहमयी दुनियेत राहुनही भूतकाळात गुंतून न राहता वर्तमानात सतत नवनवीन प्रयोग करताना भविष्यकाळास आकार देत राहिले. देव साहेबांनी हिंदी चित्रपटसृष्टीला स्टायलीश, सळसळत्या तारूण्याचा वरदहस्त लाभलेला सकारात्मक नायक देऊन रूपेरी पडद्यास वार्धक्याची छाया पररण्यापासून वाचवले.

दिलीप-देव-राज ही हिंदी चित्रपटसृष्टीस प्राप्त झालेली तीन रत्न होतं. त्यांनी अमूर्त छाप सोडताना कलात्मक माध्यमाच्या हाताळणीचे नवनवे प्रयोग करून एक कालखंड घडवला. तिघांनीही अभिनयाच्या भिन्न शैली प्रस्थापित केल्या. दिलीप साहेबांनी ट्रॅडेजी किंग रंगवला, राज कपूरने साळा-भोळा नायक प्रस्थापित केला तर देवने स्मार्ट, स्टायलीश नायक या चित्रपटसृष्टीस बहाल केला. देव आनंद निराशावादी भूमिकांपासून नेहमी दूर राहिले. गाता रहे मेरा दिल...म्हणत त्यांनी सकारात्मक जगताना जीवनास नवीन दृष्टी देणार्‍या भूमिकाच साकारल्या आणि प्रत्यक्ष जीवनातही त्यांनी हेच तत्वज्ञान पाळले. अमृत प्राप्त झालेल्या या नायकाच्या चेहर्‍यावर कधी सुरकत्या पडलेल्या प्रेक्षकांनी पाहिल्या नाहीत. ते भरभरून जीवनरस प्यायले आणि भारतीयांसाठीही त्याचे कुंड भरून ठेवले. त्यांनी प्रेक्षकांना पर्याय दिले आणि निवडीचा निर्णय दर्शकांवर सोडून दिला.

स्वत:च्या जीवनतत्वज्ञानावर त्यांचा अढळ विश्वास होता आणि तो ८८ वर्षाच्या जीवनप्रवासात कधीही ढळला नाही. वाटेत कित्येक वळणं आली असतील मात्र त्यांची वाट चुकली नाही. हेतुपरस्पर दुर्लक्ष करत तो चालत राहिला. जीवनप्रवास हा अखंड चालणारा कालप्रवाह असून तो कधीही थांबत नाही, तो अखंडीत आहे, हेत त्याने सांगितले. आपणास प्राप्त झालेले जीवन खूप छोटे असून ते व्यर्थ घालवणे इष्ट नाही.

सतत चालत राहून, व्यग्र राहून, प्रत्येक क्षणाचा सवौच्च उपयोग घ्यायचा, प्रत्येक क्षण अनुभवायचा, हेच त्यांनी सांगितले. हे जग, ही मोहमयी दुनिया, कारकीर्दीतले महान चित्रपट हे खूप सुंदर आहे मात्र मला येथेच थांबता येणार नाही, याहीपलीकडे आणखी खूप काही आहे, त्याचा शोध मला घ्यायचा आहे. जीवनाला दिलेलं वचनं मला निभवायच आहे,मला शेवटचा श्वास घेण्याअगोदर खूप दूर जायचे आहे, हेच देव साहेबांनी प्रत्येक गोष्टीतून सांगितले. रॉबर्ट फ्रॉस्टने आपल्या कवीतेतून हे तत्वज्ञान सहज, सुंदर ओळीतून शब्दबद्ध केले आहे...

The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.

Monday, November 21, 2011

उमेश यादव: भारतीय आक्रमणाची तेजतर्रार धार


कोळसा खाणकामगाराचा मुलगा भारताचा प्रमुख क्रिकेटपटू होऊ शकतो काय....?.. शाळामास्तरचा मुलगा देशातील प्रमुख उद्योगपती होऊ शकतो काय, शेतकर्‍याचा मुलगा पंतप्रधान होऊन देश चालवू शकतो काय....?

आजही गुलामगिरीचा पगडा असलेल्या सामान्य भारतीय मनासाठी हे स्वप्नवत आहे. आपल्यासारखा गरीब, सामान्य व्यक्ति इतके महान कार्य करण्यास सक्षम आहोत काय याबाबत त्यांच्या मनात साशंकताच असते. धनाढ्य,गर्भश्रीमंत, उच्चशिक्षित, प्रशासन, सत्ताकारणात वरिष्ठ पदावर असलेली माणसंच ही महान कामं पेलु शकतात, असा एक भाबडा समज त्याच्या मानसिकतेत रूजलेला असतो. शुन्य आत्मविश्वास आणि क्षमतांची, कौशल्याची जाण नसलेले सामान्यमण त्या मानसिकतेच्या वलयातच गुरफलेलं असते. मात्र शतकानुशतके समाजमणाच्या मानगुटीवर बसलेल्या या मानसिकतेस नाकारून स्वत:तील क्षमता, कौशल्य, जीद्द, आणि मेहनतीच्या जोरावर कुणीही काहीही करू शकतो, बनू शकतो हे अनेकांनी दाखवून दिले आहे. भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव हा त्यातलाच एक.

कोलकात्यात वेगवान मार्‍याने विंडीज संघाची दाणादाण उडवणार्‍या उमेशने तमाम तरूणाईच्या आशा पल्लवित केल्या आहेत. मनगटात दम आणि डोक्यात विचार असल्यास कोणताच अडथळा, कमतरता तुमचा मार्ग रोखू शकत नाही, हा आत्मविश्वास त्याला जागवला आहे. महाराष्ट्र राज्यातील तथाकथीत मागास समजल्या जाणार्‍या विदर्भात चंद्रपुर जिल्हा आहे. येथील माजरी हे त्याचे गांव. वडिल येथील कोळसा खाणीत काम करतात. विदर्भातील आंध्र प्रदेशला लागून असलेल्या भागात कोळसा खाणी आहेत. या भागात औष्णिक विजनिर्मिती प्रकल्पही असून राज्याला ‍बहुतांश विद्युतपुरवठा येथूनच होतो. हा भाग खनिज संपत्तीने समृद्ध असण्यासोबतच वनश्रीने नटलेला आहे. म्हणूनच राज्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असल्यानंतरही तो तथाकथित मागास आहे, हे न समजणारे कोडे. मात्र या उपेक्षित परिस्थितीवर मात करून तो भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला आहे, ही त्याची अचिव्हमेंट आहे.

उमेशचे बालपण येथील राकट देशा...कणखर देशश... दगडांच्या देशातंच गेले. सर्वात दूर कोळसा कोण फेकतो म्हणून मित्रांसोबत त्याच्या पैजा लागायच्या आणि अंगकाठीने दांडगा, राकट, उंचपुरा असलेला उमेशच नेहमी पैजा मारायचा. गरीब कुटुंबात कोळसा खाणीच्या प्रदेशात बालपण गेले. भाकरी खाऊन मिंत्रासोबत खेळणं आणि परिस्थितीनुसार पडलेली कामं करत शरीर चांगल कसल्या गेलं. आपण क्रिकेटपटू बनून देशाकडून खेळू हे त्याने स्वप्नातही पाहिले नव्हते. पोलिसात भरती व्हायचे इतकेच काय ते त्याच्या मनाने घेतले होते. त्यासाठी शरीर बलदंड व्हावे म्हणून शारीरिक कसरत, धावण्याचा व्यायाम हा त्याच्या दिनक्रम बनला होता.

वजनी कोळसे फेकता फेकता उमेश बंदुकीच्या गोळीसारखा चेंड़ फेकु लागला आणि बघताबघता वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपास आला. २००८ साली नोव्हेंबर महिन्यात त्याने रणजी पर्दापण केले. वेगवान गोलंदाजांची वाणवा असलेल्या आपल्या देशात सारखा १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणार्‍या उमेशने अवघ्या दोन वर्षात राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले
आणि २०११ मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून आयपीएल स्पर्धेत खेळला. यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या एमर्जिंग प्लेअर्स स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करून आपण आंतरराष्ट्रीय स्तराचे मटेरियल असल्याचे सिद्ध केल्याबरोबर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली आणि त्याने दिल्लीत पहिल्या कसोटीतच आपली छाप सोडली. कोलकाता कसोटीत तर उमेशच्या गोलंदाजीत चांगलीच धार जाणवली. त्याच्या गोलंदाजीत सामण्यागणीक झपाट्याने सुधारणा होत आहे. सातत्याने १४० पेक्षा जास्त वेगावे मारा करण्यासोबतच चेंडू जुना झाला म्हणजे रिव्हर्स स्विंग करण्यात त्याचा हातखंडा आहे. आतापर्यंत भारतीय संघास सतावणारे प्रतिस्पर्धी फलंदाजीचे शेपटाची वळवळ थांबवली ती उमेशनेच.
१४५ च्या वेगाने भेदक मारा करून तो अवघ्या ५ मिनिटात शेपूट गुंडाळून डांव संपृष्टात आणतो. कोलकाता कसोटीत त्याने घेतलेल्या ७ बळींपैकी ५ जणांचा त्याने त्रिफळा उद्वस्त करताना विंडीजची फलंदाजी अक्ष.रशा कापून काढली होती.

त्याच्या गोलंदाजीचे विश्लेषण 'रॉ स्पेस विथ ब्रेन' असे करता येईल. त्याच्या गोलंदाजीत सुसाट वेगासोबतच अचूकता दिसून येते. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता तो धिरोदात्तपणे गोलंदाजी करतो. त्याच्या चेहर्‍यावर तणावाऐवजी शांत भाव असतात. ही मानसिकता मोठ्या खेळाडूची ओळख आहे. आपणाजवळ क्षमता, कौशल्य तर आहे मात्र कणखर मानसिकता नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर फार काळ टिकणे शक्य नाही. आपात्कालीन परिस्थितीत जो खिंड लढवतो, तोच खरा योद्धा. उमेशने आतापर्यंत २ कसोटीतून ९ बळी घेतले असून आगामी ऑस्ट्रेलिया दौर्‍यात त्याला चांगली संधी आहे. ऑसीजना सळो कि पळो करून सोडण्याची धमक त्याच्यात असून भारतीय संघास दमदार कामगिरी नोंदवण्यात त्याचा महत्तवाचा वाटा असेल. ब्राव्हो उमेश!

Sunday, September 4, 2011

अनिल अवचट


डॉ. अनिल अवचट वास्तववादी लेखक आहेत. वातानुकूलित खोलीत बसून कॉफीचे भुरके मारत विश्लेषण करणार्‍या किवा कल्पनांचे महाल उभारणार्‍या लेखकांपेक्षा डॉ. अवचट यांची जातकुळी जरा वेगळी आहे. कोणतीही समस्या किवा प्रश्नावर लिहिण्या अगोदर ते ती परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवतात.

त्यांच्या लेखनाची शैली व पद्धतच तशी आहे. थोडक्यात रिपोर्ताज पद्धतीचे लेखन त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले. त्यांच्या वेगळ्या नि वास्तववादी शैलीमुळे लोकांना ते आवडलेही. कृतीवर विश्वास ठेवणारया अवचटांचे लेखन अनुभव व कृतीतून उमटते.

त्यामूळेच वाचक जेव्हा अवचटांना वाचतो तो त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. ते वाचकांना वस्तुनिष्ठ व वास्तव अनुभव देतात. अवचटांची लेखनशैली साधी, सरळ व अनलंकृत आहे. अवचटांचा पिंड आहे कार्यकर्त्याचा. समाजसेवकाचा. त्यांनी प्रश्नांना, समस्यांना वरवरून बघितले नाही, तर समस्येच्या थेट मुळाशी पोहचण्याचा त्यांचा आग्रह असतो. डॉ. अवचट यांनी पुण्यात. बी. जे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली.

वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही त्यांच्या चर्चा चालायच्या त्या सामाजिक क्रांती, सुधारणा, जागृती, विकास या विषयांवरच. डॉ अवचटांच्या बी. जे. मधील मित्रांमध्ये डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ जब्बार पटेल यांचा समावेश होता. कलाक्षेत्रात रस असणारे हे त्रिकूट संपूर्ण महाविद्यालयात 'फेमस' होतं. महाविद्यालयातील स्नेहसंमेलने, महोत्सव, आंदोलने हे यांचे प्रांत. तिघांनीही वैद्यकीय पेशा सोडून कला, समाजसेवा, व राजकीय क्षेत्रांत स्वतःला वाहून घेतले.

डॉ. अवचट यांनी डॉक्टरकी सोडून संपूर्ण वेळ समाजसेवा व लेखनाला द्यायचा निर्णय घेतला. या काळात त्यांच्या पत्नीची त्यांना खंबीर साथ लाभली. मादक द्रव्याच्या आहारी गलेले तरूण, आहारी जाण्याची कारणे व आहारी गेल्यानंतर कौटूंबिक, सामाजिक, आर्थिक पातळीवर उभी राहणारी आव्हाने यांचा अभ्यास केला. यातून आलेल्या अस्वस्थतेतून 'गर्द' हे पुस्तक निर्माण झाले. मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या तरूणाईला वाचविण्यासाठी काही तरी करायला पाहिजे या अस्वस्थतेतून 'मुक्तांगण' ही संस्था उभी राहिली.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी मुक्तांगणच्या उभारणीत प्रारंभी हातभार लावला. कोंडमारा, कार्यरत, माणसे, जगण्यातील काही, धागे उभे आडवे ही डॉ. अवचटांची काही पुस्तके. डॉ अवचटांनी 'स्वतविषयी' हे आत्मपर पुस्तक लिहिले आहे.

स्वतःविषयी हा स्वतच्याच उभ्या आडव्या आयुष्याचा वस्तूनिष्ठ वृतांत आहे. डॉ अवचट यांच्यात कलावंत खच्चून भरला आहे. डॉ अवचट उत्तम रेखाटन, चित्रकला, शिल्पकला यासोबतच ओरीगामी कलेत त्यांनी प्राविण्य मिळविलेले आहे. चित्रकला, ओरीगामी हे त्यांचे फावल्या वेळतील छंद आहेत. या छंदांबद्दल त्यांनी 'छंदाविषयी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

भाऊ पाध्ये: मुंबईतील संक्रमणकाळ टिपणारा लेखक


भाऊ पाध्ये हे सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला आहे.
मुंबईसारख्या विविधांगी व मिश्र संस्कृती असलेल्या शहरात संक्रमणकाळात झालेले बदल व त्याचा समाजातील सर्वच स्तरावर विशेषत: तरूण पिढीवर झालेल्या परिणामांना त्यांनी आपल्या लेखनातून अभिव्यक्ती दिली आहे.

भाऊंनी 'वासूनाका, अग्रेसर, राडा' या कादंबर्‍या लिहिल्या. 'राडा' मध्ये उच्चभ्रू कुटूंबातील तरूण, मनाविरूद्ध झालेले निर्णय सहन करू न शकल्याने वाहवत जातो. महानगरीय वातावरणात विविध सामाजिक, राजकीय प्रवाह निर्माण होत असतात व त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम समाजमनावर होत असतो.

अशा परिणामाच्या काही पिढ्या असतात. सत्तरच्या दशकात शिवसेनेने मुंबईत आपला प्रभाव निर्माण करायला सुरवात केली होती. कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर असलेल्या या शहरात कापड गिरण्या व गिरणी कामगार यांची वेगळीच संस्कृती निर्माण झाली होती.

बहुतांश कामगार वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपरर्‍यातून आला होता. शिवसेनेचा अजेंडा मराठी मनाला भुरळ घालणारा होता. त्यामुळे महानगरीय वातावरणात मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाणार्‍या मराठी तरूणांना शिवसेना हे हक्काचे व्यासपीठ मिळाले.

त्यामुळे शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झाला. कामगार संघटनांतून कम्युनिस्टांची हकालपट्टी करून सेनेने मराठी ताकद आपल्या पाठीशी उभी केली. 'राडा' मध्ये ही सारी पार्श्वभूमी येते. किंबहूना या वातावरणातूनच तिची निर्मिती झाली आहे.

पाध्येंनी या बदलांमुळे होणार्‍या परिणामांचे मानसिक विश्लेषण न करता कादंबरीत संवादात्मक व पटकथात्मक, सरळ मांडणी करून विश्लेषण व निर्णयाचे स्वातंत्र्य वाचकांवर सोपविले आहे. त्या काळात ही कादंहबरी वादग्रस्तही ठरली होती.

पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत.

भीमाशंकर: सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातून वन्यजीवदर्शन


भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध येथेच केला होता. यावेळी शंकरास आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंदिराच्या मागे मोक्षकुंड असून घनदाट जंगल आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या येथील जंगलातून फिरताना 'शेकरू' हा खारीसारखा दिसणारा दुर्मिळ प्राणी आपले लक्ष वेधून घेईल. येथील जंगल सदाहरित आहे. पाठीवर सॅक टाकून येथील जंगलातूनभटकंतीचा आनंद अवर्णनीय असतो. पहाटेस दाट झाडीतून सूर्याची किरणे डोकावण्याच्या क्षणी पक्षांच्या कर्णमधुर किलबिलाटात येथील दर्‍याखोर्‍यातून सैर करण्याची अनुभूती विसरणे अशक्यच. पक्षीनिरीक्षक व जिज्ञासू वृत्तीच्या पर्यटकांसाठी हे आदर्श ठिकाण आहे. निसर्गप्रेमींना येथे स्वर्ग भूतलावर अवतरल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही.

सह्याद्रीच्या कड्या-कपार्‍यात पावसाच्या वर्षावास सुरूवात झाल्यानंतर येथील सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. येथून भीमा नदी उगम पावून कर्नाटकात कृष्णा नदीत विलीन पावते. येथील जंगल हिरवाईने नटलेले असून येथे आंबे, जांभूळ, हिरडा, बेहडा, बांबू व औषधी वनस्पतीने समृद्ध आहे. अभयारण्याचे वनक्षेत्र मिश्रित वनश्रीने समृद्ध असल्याने येथे जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो.

पर्यटकांना येथे सृष्टीसौंदर्याचा अभूतपूर्व साक्षात्कार घडतो. साहसी पर्यटक व ट्रेकर्ससाठीही हे नंदनवन आहे. दूरवर पसरलेल्या हिरव्यागार पहाडाच्या रांगांमधून वाहणार्‍या नद्यांचा परिसर पर्यटकांना साद घालतो. याशिवाय हनुमान टँक, नागफणी पॉंईंट येथेही भेट देता येईल. येथून चाळीस किलोमीटरवरील डिंभे डॅम विशेष प्रसिद्ध असून येथे आठवड्याच्या शेवटी येथे पर्ययकांच्या गर्दी करतात. वर्षातील काही महिने सोडले तर तिन्ही ऋतूत येथे आनंद घेता येते. पर्यटन महामंडळाने येथे निवासाची व्यवस्था केली आहे. टेहळणी मनोर्‍यांहून येथील वन्यजीव निरीक्षणाचाही आनंद घेता येईल.

पोहचायचे कसे?
विमान, रेल्वे व रस्ते मार्गाने येथे पोहचता येते. विमानाने पोहचायचे झाल्यास सव्वाशे किलोमीटरवर पुणे विमानतळ आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरहून (62 किमी) येथे पोहचता येते.

निसर्गरम्य फणसड अभयारण्यातून भटकंती


निसर्गाची विविधांगी रूपे याची देही याची डोळा अनुभवण्यातील आनंद अवर्णनीय असतो. कोकणातील फणसड वन्यजीव अभयारण्यात आपणांस याची प्रचीती येईल. विधात्याने सृष्टी सौंदर्याची लयलूट केलेल्या निसर्गासोबतच नयनरम्य समुद्रकिनारे हे फणसड अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. रायगड जिल्हयातील रोहा व मुरूड तालुक्यात सुमारे त्रेपन्न चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात हे अभयारण्य पसरले आहे.

जैवविविधतेने समृद्ध नटलेल्या समुद्रकिनारपट्टीलगतच्या जंगलाची विविध रूपे पाहायची ती येथेच. अभयारण्यात सुमारे एकवीस जातींच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. याशिवाय विविध वनस्पतींच्या सुमारे एक्क्यांनऊ प्रजातीं येथे आहेत. यावरून येथील जैविक विविधता लक्षात येईल. औषधी वनस्पतींचाही येथे खजिना आहे. विधात्याने नैसर्गिक जैवविविधतेची येथे लयलूट केली आहे.

सांबर, चित्ता, जंगली अस्वल या प्राण्यांचा येथील वनश्रीने नटलेल्या जंगलात मुक्त संचार आढळतो. येथील हिरव्यागार जंगलातून पक्षांच्या सुरेल सुरावटींच्या सानिध्यात मुक्त भटकंतीचा अनुभव अविस्मरणीय असतो. सुपेगावातून निसर्ग सहल नैसर्गिक सौंदर्याचा साक्षात्कार घडवते. निसर्गप्रेमींना माजगांव येथील निसर्ग केंद्रासही भेट देता येईल. अरबी समुद्राच्या आकाशास भिडणार्‍या लाटा झेलत स्थितप्रज्ञासारखा उभा असलेल्या जंजीर्‍यास भेट द्यायला विसरू नका. येथे थरार, रोमांच, साहस, अशा मिश्रित भावनांच्या अद्वितीय अनुभवाचे आपण धनी व्हाल.

अरबी समुद्राच्या आकाशास भिडणार्‍या लाटा झेलत स्थितप्रज्ञासारखा उभा असलेल्या जंजीर्‍यास भेट द्यायला विसरू नका. येथे थरार, रोमांच, साहस, अशा मिश्रित भावनांच्या अद्वितीय अनुभवाचे आपण धनी व्हाल. ऑक्टोबर ते एप्रिल ही येथे भेटीची उत्तम वेळ आहे. निर्सगाच्या सानिध्यात काही काळ घालवायचा असल्यास येथे निवासाची व्यवस्थाही आहे.

कसे पोहचायचे?
विमान, रस्ते व रेल्वेने येथे पोहचता येते. मुंबई हे जवळचे विमानतळ आहे. कोकण रेल्वेने जायचे झाल्यास रोहा हे येथून तीस किलोमीटर अंतरावर स्टेशन आहे. मुंबईहून येथील अंतर दीडशे तर अलिबागहून पन्नास किलोमीटरवर अभयारण्य आहे.

Monday, August 29, 2011

अण्णांच्या आंदोलनाने कॉंग्रेसमध्ये भूकंप!


कॉंग्रेसचे खासदार प्रवीण ऐरण यांनी अण्णा हजारे मुद्याप्रकरणी पक्षात चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाने अण्णांच्या आंदोलनाचा मुद्दा योग्य प्रकारे हाताळला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींना बदानाम करण्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी हे कारस्थान केले काय, हे बाहेर यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.


लोकपालप्रश्नी अहिंसक आंदोलन करणारे गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे आंदोलन हाताळताना कॉंग्रेस पक्षाने सुरूवातीपासून शेवटपर्यंत घोडचूका केल्याचे तमाम भारतीयांनी पाहिलेच आहे.

यातून या आंदोलनाबाबत पक्षात एकवाक्यता नाही, पक्षात अंतर्गत मतभेद आहेत, हे स्पष्ट होतच होते. सपुआ सरकारने तमाम भारतीयांच्या भावनांचा अनादर करत अण्णांचे जनआंदोलन दपडशाहीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र त्यात यश न आल्यावर सरकारची पिछेहाट सुरू झाली. यातून सरकारसोबतच कॉंग्रेस पक्षाची नाचक्की झाली. याप्रकरणी पक्ष आणि सरकारमध्ये कधीच एकवाक्यता दिसली नाही.

अण्णांनी उपोषण सोडावे यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत प्रस्ताव मांडून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यास सर्वपक्षीय समर्थन मिळण्यासोबतच संसदेनेही अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र दुसर्‍या दिवशी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आपण 'गेम चेंजर' असल्याचा आभास निर्माण करत लोकपालला घटनात्मक दर्जा असावा, निवडणूक आयोगप्रमाणेच लोकपालही घटनात्मक संस्था असावी, असे वक्तव्य संसदेत करत मुद्यास वेगळेच वळण दिले होते.

यामुळे अण्णांच्या तीन मुद्यांवर संसदेत सहमती निर्माण करण्याच्या प्रयत्नास खीळ बसल्याने अण्णांचे उपोषण सुटण्याऐवजी आणखी पुढे ढकलल्या गेले होते. नंतर प्रकरण शेकणार असल्याचे लक्षात आल्यावर सपुआ सरकारने संसदेत चर्चा करून मुद्यांवर सहमती झाल्याचे सभागृहाचे मत अण्णांना कळवल्यावर तेराव्या दिवशी उपोषण संपले होते. कॉंग्रेसमध्ये अण्णा आंदोलन हाताळण्याबाबत असलेले अंतर्गत मतभेद प्रवीण ऐरन यांच्या मागणीने चव्हाट्यावर आले आहेत.

Sunday, August 28, 2011

वतन मे फिजा बदली, शुरूवात नये दौर की..


भ्रष्ट्राचाराविरूद्ध लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी राजधानीत इंडिया गेटवर जनसागर लोटला आहे. 'मै भी अण्णा तु भी अण्णा, अब तो सारा देश है अण्णा' चे नारे देत लोक जनआंदोलनाचा विजय साजरा करत आहेत.

संध्याकाळनंतर येथे जवळपास २५ हजार लोक जमा झाले असून जल्लोषाच्या वातावरणाने परिसर निनादून गेला आहे. लोकशाहीत जनभावना लक्षात घेऊन कायदे बनवले गेले पाहिजे, जनभावनेचा आदर देशकारभार हाकताना राज्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे, लोकशाहीत जनताच सर्वश्रेष्ठ असली पाहिजे, यासाठी जनजागृती आवश्यक असते. हे जीवंत लोकशाहीचे उदाहरण आहे. असल्या अहिंसात्मक जनजागृती करणार्‍या आंदोलनानेच खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक प्रस्थापित होईल आणि लोकशाही अधिक सुदृढ व प्रगल्भ होईल.

अशा तमाम भारतीयांच्या भावना, इच्छा आणि आकांक्षा होत्या, आहेत आणि राहिल. मात्र राज्यकर्ते राजधर्म विसरले म्हणजे लोकशाहीचा गळा घोटल्या जातो, अराजक व अनागोंदीकडे राष्ट्राची वाटचाल सुरू होते आणि जनतेचा हुंकार दडपण्यासाठी दमन, दडपशाही आणि हुकुमशाहीकडे झुकणारी राजवट घट्ट करण्यासाठी शासनकर्त्यांचे हात सरसावतात. भ्रष्ट्राचार सार्वत्रिक होतो आणि लोकांचे हुंकार दडपले जातात. याविरूद्ध देशवासियांच्या मनात असंतोष खदखदत असतो फक्त त्याला असंतोषास दिशा देणारे नेतृत्व आणि व्यासपीठ हवे असते. अण्णांच्या आंदोलनाने ते मिळाले आणि सारा देश रस्त्यावर उतरला आणि त्यानंतर काय झाले ते आपण पाहतच आहोत....

अण्णागिरीने राष्ट्रात नवचैतन्य संचारले असून त्याचेच प्रत्यंतर दिल्ली, मुंबई आणि सार्‍या देशभर निघालेल्या विजय यात्रांमधून येत आहे. देशभर हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या लाखोंच्या जनांच्या प्रवाहातून आता 'नया दौर'ची सुरूवात झाल्याचेच हे घोतक आहे.

Tuesday, August 16, 2011

भारत आणि 'नंबर एक' मधील अंतर संपवण्यासाठी!

विदेशातील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजी ढेपाळते हा इतिहास आहे. भारतात प्रामुख्याने पाटा खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सराव असल्याने हे घडते. त्यातच लीग क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे तरूण क्रिकेटपटू झटपट क्रिकेटमधून मिळणारी प्रसिद्धी आणि पैशाच्या चक्रात अडकतात. झटपट क्रिकेटमुळे कसोटीसाठी लागणार्‍या तंत्रशुद्धतेत तरूण क्रिकेटपटू पिछाडतात. वेस्ट इंडीजमध्ये वरिष्ठ खेळाडूंच्या अनु‍पस्थितीत हे प्रकर्षाने जाणवले. उद्या कसोटी संघात दावा सांगणारे आपले तरूण क्रिकेटपटू विंडीजसारख्या कमकुवत संघाविरूद्ध एकाही डावांत ३०० धावांचा पल्ला गाठू शकले नाहीत. आणि इंग्लंड दौर्‍यातही वरिष्ठ फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर तरूण खेळाडू खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. त्यांच्याकडे स्विंग होणार्‍या खेळपट्ट्यांवर उसळते चेंडू खेळण्याचे तंत्रच नाही. आणि कसोटीत खेळण्याची कणखर मानसिकताही नाही.

कसोटीत फलंदाजांची खर्‍या अर्थाने 'कसोटी' लागत असते. फलंदाजाचे तंत्र, क्षमता, कौशल्य, आणि प्रदिर्घ खेळी करण्याची मानसिकतेचा कसोटीतच कस लागत असतो. इंग्लंड दौर्‍यात विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर या नियमित सलामी फलंदाजांच्या अनुपस्थितीत द्रविडला सलामीस आणि लक्ष्मनला तिसर्‍या क्रमांकावर खेळावे लागले. परिणामी नवीन स्विंग होणार्‍या मार्‍यात त्यांचा नाहक बळी गेल्याने संघातील तरूण खेळाडूंवर मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी पडली. मात्र, ते भारतासाठी धावा करू शकले नाहीत, प्रतिस्पर्धी संघाने उसळत्या मार्‍याचे आक्रमन केल्याबरोबर त्यांनी शस्त्र खाली टाकून रणांगणातून पाय काढला.

या तरूण क्रिकेटपटूंची टी-२० क्रिकेटमध्ये कामगिरी दृष्ट लागण्याजोगी आहे. देशाअंतर्गत मर्यादित षट्कांच्या सामन्यातही त्यांची कामगिरी आश्वासक वाटते. म्हणूनच त्यांच्याकडे द्रविड, सचिन, लक्ष्मनला पर्याय म्हणून बघण्यात येत आहे. मात्र, त्यांच्यात कसोटी संघात राहण्याचीही कुवत नसल्याचे इंग्लंड दौर्‍यात सिद्ध झाले आहे. भारताकडे सद्यातरी सचिन, द्रविड, लक्ष्मन या त्रिकुटाची जागा घेण्याची क्षमता असलेले फलंदाज नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे भविष्य काय असेल हे सांगणे कठिण आहे. भारताचे टेस्ट साम्राज्य आत्ताच खालसा व्हायच्या उंबरठ्यावर असताना भविष्यात आपण कसोटी क्रिकेटमध्ये कोठे असू हे काळच ठरवेल.

लीग किंवा टी-२० क्रिकेटची लोकप्रियता, आर्थिक उलाढाल आणि मनोरंजन मुल्यं मोठे आहे. यामधून तरूण प्रतिभावान क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळण्यासोबतच चांगला पैसा व प्रसिद्धीही मिळत आहे. हे लक्षात घेता 'झटपट' प्रकाराला दोष देणे योग्य नाही. तर नव्या दमाच्या, उमद्या क्रिकेटपटूंनी स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्यासोबतच आपल्या प्राथमिकता ठरवणे आवश्यक आहे. मला फक्त झटपट क्रिकेट खेळून पैसा कमवायचा आहे की प्रदिर्घ काळासाठी देशासाठी खेळायचे आहे, देशाकडून महत्त्वाच्या दौर्‍यात कसोटी क्रिकेट खेळायचे असल्याने त्याअगोदर विश्रांती घेऊन तंदुरूस्त रहायचे कि 'झटपट' क्रिकेट खेळून दुखापतग्रस्त व्हायचे, हा निर्णय खेळाडूंनीच घ्यायचा आहे.

या तरूण खेळाडूंना देशाकडून कसोटी क्रिकेट खेळायचे असल्यास त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन या प्रकाररासाठी लागणारे फलंदाजी तंत्र विकसित करावे लागेल. यामध्ये सुरूवातीला वेळ द्यावा लागेल मात्र एकदा हे तंत्र विकसित झाल्यानंतर त्यांना 'तिन्ही' प्रकारात खेळायला अडचण जाणार नाही. वेळ व आवश्यकतेनुसार थोडाफार बदल करून ते तिन्ही प्रकारात (टेस्ट, वनडे आणि टी-२०) स्वत:स सिद्ध करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहतील. आणि भारतावर सद्या इंग्लंडमध्ये ओढवलेली नामुष्की पत्करण्याची वेळ येणार नाही.

संघव्यवस्थापनासही क्रिकेटच्या उज्वल भविष्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. संघातील प्रमुख वरिष्ठ फलंदाज किंवा गोलंदाज दुखापतग्रस्त असल्यास त्यांचेजागी खेळण्यास सक्षम दुसरी फळी निर्माण करण्याचे आव्हान त्यांनी स्विकारायला पाहिजे. यासांठी दौर्‍यावर निवड झालेल्या प्रतिभावान खेळाडूंना संघात स्थान देऊन त्यांच्या प्रतिभेस न्याय द्यावा लागेल. तसेच देशातील गुणवत्तापूर्ण प्रतिभा शोधून देशाअंतर्गत मालिका आणि दौर्‍यांमध्ये त्यांना संधी देऊन मजबूत 'दुसरी फळी' उभारावी लागेल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे करू शकते तर आपण का नाही? ऑस्ट्रेलियन क्रिकेट सद्या याच प्रक्रियेतून जात असून त्यांनी दुसरी फळी उभारण्यासाठी धोरणात्मक धाडसी निर्णय घेऊन निकराचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र भारतात निवडकर्त्यांनी आणि नंतर संघव्यवस्थापन व कर्णधाराची मर्जी यातच ही प्रक्रिया अडकली आहे.

भारतातील क्रिकेट प्रशासन अर्थातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळही परदेशातील भारताच्या निराशाजनक कामगिरीस जबाबदार आहे. भारताने ऐंशीच्या दशकातच विश्वविजेतेपद पटकावून जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:स स्थापित केल्यानंतर आणि परदेशात कसोटी मालिका विजय संपादन केल्यानंतर भारतीय क्रिकेट प्रशासनाने भविष्यकालीन वाटचाल लक्षात घेऊन धोरणात्मक आणि धाडसी निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती ओढवली नसती. भारतीय संघ कोणत्याही भूमीवर कोणत्याही संघास धुळ चारण्यास सक्षम राहिला असता आणि खर्‍या अर्थाने टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर एकचा संघ म्हणून आज भारतास मिरवता आले असते. कारण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेस त्यांच्या देशात जाऊन पराभूत केल्याशिवाय भारत खर्‍या अर्थाने नंबर एकचा संघ ठरणार नाही.

यासांठी क्रिकेट प्रशासनास देशभरात वेगवान खेळपट्ट्या बनवाव्या लागतील. यामुळे आपणास दोन-तीन वर्ष नुकसान होईल, मा‍त्र आपली समस्या कायमची सुटेल. रणजी क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी देशात वेगवान खेळपट्टया उपलब्ध केल्यास देशातील नवीन, तरूण प्रतिभा या खेळपट्ट्यांवर तयार होईल आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कोठेच कमी पडणार नाही. भारत खर्‍या अर्थाने सर्वच ठिकाणी वाघासारखा खेळेल, त्यांना शेळ्या बनून खेळावे लागणार नाही. आणि सद्या इंग्लंडमधील संघाच्या कामगिरीने मान झुकली तशी वेळ तमाम भारतीयांवर येणार नाही!

Sunday, May 2, 2010

येवा सिंधुदूर्गात स्वागत असा

क्षितिजापर्यंत परसलेल्या निळ्याशार समुद्राच्या सानिध्यात चंदेरी वाळूच्या किनार्‍यावर मुक्तपणे हिंडताना कोळी बांधवांचा जाळे फैलावण्याचा खटाटोप चाललेला... मासेमारीसाठी पारंपारिक बोटी समुद्रात ढकलल्या जाताहेत... मनाच्या कप्प्यात कोठेतरी जपलेल्या या चित्राची वास्तव अनुभूती आली तर? कोकणातील कुठल्याही किनाऱ्यावर हा अनुभव घेता येतो. पण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नितळ किनार्‍यांवरची त्याची अनुभूती काही वेगळीच. एकिकडे हिरवाईने नटलेल्या भूतलास कवेत घेणारा विशाल सह्याद्री तर दुसरीकडे निळ्याशार सौदर्याचा अविष्कार करणारा अरबी समुद्र. यादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश पर्यटकांना सृष्टीसौंदर्याचे अनुपम दर्शन घडवतो.

कोकणातील वेंगुर्ला हा तर स्वप्ना‍तला गाव. मंगेश पाडगावकरांचे जन्मगाव असलेल्या गावातील स्वप्नाळूपणा त्यांच्या कवितांत अवतरला नसता तरच नवल. वेगुर्ल्याला शुभ्र वाळूचा समुद्रकिनारा लाभला आहे. गावाभोवतालच्या टेकड्यांवर नारळ, काजू, आंब्याच्या बागा बहरल्या आहेत. एखाद्या चित्रात फिट्ट बसावे असे हे गाव. विलक्षण निसर्गसौंदर्याच्या कोंदणात वसले आहे. येथील रामेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच नारळाच्या झाडीत लपलेले सुंदर शहर म्हणजे मालवण. दगडी भूप्रदेशात सिंधुदुर्ग व पद्मगड हे दोन जलदुर्ग आहेत. त्यांना जोडणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवणने मिठागरे, चिनी मातीची भांडी व मालवणी खानपानासाठी ख्याती प्राप्त केली आहे.

लांबच-लांब पसरलेले समुद्रकिनारे, आपल्या उंचीने ढगांच्या उरात धडकी भरवणारी नारळाची झाडे, स्वच्छ सुर्यप्रकाशात तब्बल वीस फुटापर्यंयत समुद्राचा तळ दिसेल एवढे नितळ समुद्र सिंधुदुर्गाशिवाय इतरत्र पहायला मिळणे दुरापास्तच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ला तालुक्यात तारकर्ली, शिरोडा, वेळागर, निवाटी हे प्रदुषण व मानवी हस्तक्षेपापासून मुक्त समुद्रकिनारे आहेत. धकाधकीच्या शहरी आयुष्यातून हद्दपार झालेला निसर्ग आपल्याला येथे भेटतो. येथील निवांतपणा कुठल्याशा पवित्र शांततेचीही अनुभूती देतो. मन स्वच्छ झाल्यासारखे वाटते. सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत हातात कॅनव्हास, ब्रश घेवून मुक्तपणे फिरून विधात्याने निर्माण केलेले मनोहारी चित्र आपल्या मनावर उतरवण्याचा प्रयत्न करून बघायचा, तोही येथेच.

येथील समुद्रकिनार्‍यावरील सुर्यास्तावेळचे रंगाची उधळण करणारे दृश्य आयुष्यभर आपणांस आनंद देत राहील. नैसर्गिक सौदर्यासोबतच साहसी पर्यटक व इतिहासप्रेमीनाही सिंधुदूर्ग आवर्जून बोलावतो. सतराव्या शतकात बांधण्यात आलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्गही मालवणपासून जवळच आहे. शत्रूच्या उरात धडकी भरवणारा हा जलदुर्ग आजही अरबी समुद्राच्या लाटांचा सामना करत निकराने उभा आहे. वेंगुर्ल्याहून जवळच शिरोडा हे गाव आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकरांचे हे गाव. येथील समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारताना खेड्याभोवती पसरलेले मिठागरांचे दृश्य म्हणजे जणू पांढरा समुद्र समोर पसरल्यासारखे वाटते.

कोकणात पर्यटनास गेल्यास कोकणी पदार्थाची लज्जत अनुभवल्याशिवाय परतणार्‍याची गणना अरसिकातच होईल. तारकर्लीत खास कोकणी रेस्टॉरंट आहे. दोन-तीन दिवस भटकायचे झाल्यास महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने निवासाची व्यवस्थाही येथे केली आहे.

कसे पोहचाल : तारकर्लीचे मुंबईपासून अंतर आहे साडेपाचशे किलोमीटर. कोकण रेल्वेने येथे पोहचायचे झाल्यास कुडाळ स्टेशन येथून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. शिरोडा बीच वेंगुर्ल्याहून एकोणीस किलोमीटरवर आहे. कोल्हापूरमार्गेही जाता येते. कोल्हापूरहून तारकर्ली साधारणत: दीडशे किलोमीटरवर आहे. पुणे, कोल्हापूऱ, मुंबईहून मालवणसाठी बस आहेत. मालवणहून तार्कालीसाठी गाड्या आहेत. मालवण रत्नागिरीपासून दोनशे किलोमीटरवर आहे.

Friday, April 16, 2010

फ्रॉम द जर्नालिस्ट पर्सनल डायरी

टक.. टक.. टक.. दारावर वर्तमान पत्र टाकणारा मुलगा. सुरेशची साखर झोप अजूनही संपलेली नाही. झोपेतच... वैताग! पोरगं दारावरून हटायला तयार नाही. सुरेश नाराजीनेच बिछान्यातून उठून काय रे.. आ? पोरगं घाबरत, 'साहेब बील पायजे होत! ' सुरेशने पँटच्या खिशातून पैसे काढून बील चुकत केलं. सुरेशने पेपरवर नजर टाकली. पहिल्या पानावरील बातम्या वाचून झाल्यावर थेट शहर पानावर. स्वतःच्या बातमी सोबत लगेच इतर रिर्पोटर्सनी केलेल्या बातमीची तुलना. जनरल बातम्या झाल्यावर मग विशेष बातम्या. झकास!.. महानगरपालिकेतील सुरशने काढलेली जमीन घोटाळ्याची बातमी पहिल्या पानावर. तेही फक्त आपल्याच वर्तमानपत्रात.

ख़ास बातम्यांच्या बाबतीत शुरेशचा हातखंडा. शुरेशने अवघ्या तीन वर्षाच्या पत्रकारितेतील कारकीर्दीत आपले नेटवर्क तयार केले होते. इतर रिर्पोटर्सना बातमीची कुणकूण लागायच्या अगोदर सुरेश बातमी छापून तयार. वैताग झटकून आंघोळ उरकली. गाडीला जोरात किक मारली अन चाक गरगरा फिरायला लागली. ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यनारायनाने भर सकाळी आग ओकायला सुरूवात केली होती. सुरेशला ऊन्हाचा मोठा वैताग. रिर्पोटरचे काम म्हटले की फिरणे आलेच. सुरेशच्या मते पावसाळ्यात एकदाचा रेनकोट घालता येणार परंतु ऊन्हाच काय? दुपट्टा गुंडाळला तर केसांचा वैताग. नाही गुंडाळला तर ऊन लागण्याची भीती.

विचारचक्र सुरू असतानाच गंजूच्या टपरीसमोर गाडीचे कचकन ब्रेक लागून चाक फिरायची थांबली. गजू पानावर चुना लावता-लावता नमस्कार सुरेश साहेब! सुरेश, ' नमस्कार.. आजच पान रंगायला पाहिजे'. रंगणार की साहेब. बातमी लय झकास आलीय म्हटलं. गजू व सुरेश यांच्यात थोडावेळ त्यांच्या सांकेतिक भाषेत बोलचाल झाली अन सरेशने गाडीची किक मारताच चाके फिरायला लागली. गाडीची चाकं पार्किंगमध्ये थांबली अन सुरेशने टेलिफोनचा ताबा घेतला. टेलिफोनची रिंग घरघरू लागली. कुठे, काय, कस, केव्हा, का? उरकले. चमत्कार, नमस्कार झाले. मग साहेब, आज यायचं काय? काय रामभाऊ साहेब काय म्हणतायत! इत्यादी संपलंय. याला सुरेश राउंड म्हणतोय. सतर्क पत्रकारिता करायची झाल्यास किमान दोनदा राउंड घ्यायलाच पाहिजे, हा सुरेशचा दंडक. ऋतू बदलले, वर्ष गेलीत पण सुरेशची पत्रकारितेची बाराखडी बदलणार नाही.

पाचदहा फिडबॅकचे कॉल घेऊन झाले. बातमी बद्दलच्या प्रतिक्रियाही आटोपल्या. बरेच ऊन-पावसाळे निघून गेल्याने सुरेशला याचे रट्टे-घट्टे पडले होते. संपादक साहेबासोबतची बैठक आटोपली. तोपर्यंत जेवणाचा डबा आला. न्याहारी उरकली. सुरेशने दैनंदिन डायरीतील नोंदी डोळ्याखालून घातल्या. काही टिपणं काढली. गाडीला किक मारताच चाके फिरायला लागली. महानगरपालिकेचा पार्किंगमध्ये चाके थांबली. पत्रकार दालनात पोहचेपर्यंत शंभरेक नमस्कार चमत्कार झाले. महापौर, आयुक्तांची भेट- गाठ झाली. विरोधीपक्ष नेतेही भेटले. इतर पत्रकार मंडळीशी पत्रकार दालनात रोजच्या प्रमाणे मुक्त फटकेबाजी झाली.
सगळ्यांना बीट करून शहरातील प्रमुख घोटाळ्याची बातमी छापल्याने इंप्रेशन एकदम टाईट. परंतु सुरेश माणूस एकदम दिलदार मनाचा. बोलायला मनमोकळा. दोस्तांचा दोस्त. अभिजितने मधातच पिलू सोडलं, 'मग सुरेश आज कोठे बसायचं? सुरेश वैतागला. सालं बसनं, अन फालतू चकाट्या मारत ढोसणं, याचा त्याला आता वैताग यायला लागला होता.

सुरूवातीला सुरेशलाही मजा यायची. सुरेशचे आता राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या मातब्बर लोकांमध्ये बसनं-उठणं होतं. तीन वर्षाच्या अथक प्रयत्नातून त्याने स्वत:ला पत्रकारितेत प्रस्थापित केलं होत. नावं कमावलं होत. शालेय जीवनापासून चालू ठेवलेल्या वाचनात त्याने आजही खंड पडू दिला नव्हता. त्यामुळे त्याला चांगली बैठक प्राप्त झाली होती.

महानगरपालिकेची विधायक कामे, भ्रष्टाचार व राजकीय गटबाजीचे विश्लेषणात्मक व शोध पत्रकारितेचा पाया असणारे वार्ताकन तो करायचाच. यासोबतच सांस्कृतिक प्रांतातील सर्जनशीलतेला वाव असणार लेखनही तो करायचा. सुरेश कलात्मक अभिरूची जोपासणारा माणूस. संगीत, नाटक, साहित्य यात त्यास विशेष रूची. कलात्मक व दर्जेदार कलाकृतींचा त्याच्या संग्रहात समावेश नाही असं कधी झालं नाही. चौफेर वाचन, कलात्मकता जोपासणारा स्वभाव व आडव्या उभ्या क्षेत्रात असणारा त्याचा परिचय, मैत्री यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वात परिपक्वता आली होती. आपणं मिळविलेली पत, प्रतिष्ठा याला गालबोट लागू नये, यासाठी त्याने जपायला सुरूवात केली होती. अनंतानेर, काय सुरेश कसला विचार करतोस यार? असे म्हणत खांद्यावर हात ठेवल्यावर त्याची विचारचक्र थांबली. झपाझप पायऱ्या उतरून सुरेश पार्किंगमध्ये आला अन गाडीला किक बसली. चाके गरगरा फिरायला लागली. ऑफिसमध्ये येऊन त्याने कॉपी टाईप केल्या. बातमी सोडून थेट रूमवर.

नुकत्याच गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेल्या होम थियटरवर त्याने मस्त जगजीत सिंग लावला. गझलचे सुरेल, मंद स्वर वातावरणात पसरल्यावर स्लिपवेलच्या गादीवर पडून तो कॉलेजच्या आठवणीत रंगला. दररोजच्या वैतागापासून आज त्याला निवांत क्षण मिळाले होते. तीन वर्षाअगोदर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व पत्राकरिता विभागात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात महाराष्ट्रातील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांच्या संपादकांसोबत संवाद साधण्याची संधी त्याला मिळाली होती. विद्यार्थ्यामधून सुरेशने महाराष्ट्रातील राजकीय व सांस्कृतिक चळवळीवर केलेल्या विश्लेषणात्मक व तार्किक कसोटीवर टिकणाऱ्या भाषणाने झालेला कौतुकाचा वर्षाव त्यास आजही आठवतो. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात, 'सुरेश ग्रेट, एक्सलंट! हे विभाग प्रमुख व संपादकांचे शब्द आजही त्याला प्रेरणा देतात.

कविता, सुधीर, प्रवीण, केतकी यांच्या घोळक्यात रमेशच्या कँटिनवर चहाचे फुरके मारताना गरम, चुरचुरीत कांदा भजी खाताना केतकीने त्याला सार्वजनिकरीत्या प्रपोज केले होते. 'आय लव्ह यू अँड वूड लाइक टू बी विथ टू फॉरएव्हर! या शब्दांनी सुरेश एकदम चाट पडला होता. मैत्री वगैरे ठीक पण प्रेम वगैरे म्हणजे वैतागच, हे समीकरण त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेलं होत. सुरेश, 'सॉरी केतकी, अँट धीझ क्रुशीयल स्टेज आय हॅव नो टाइम फॉर लव्ह. माय फर्स्ट प्रायऑरिटी इज जर्नालिझम! केतकी, 'सुरेश आय नो दॅट यूर आर टू पॅशनेट अबाउट जर्नालीझम. बट डू नॉट कंफ्यूज प्रोफेशन विथ पर्सनल लाईफ अँड एमोशन्स. वैताग. सुरेश वैतागला. आता प्रवीण, कविता व सुधीरही चालू होणार व यांना कनव्हींस करणे शक्य नाही हे त्याला माहिती होते.

सुरेश सरळ पार्किंगमध्ये, अन गाडीस जोरात किक. चाकांसोबतच विचार चक्रही गरगरा फिरायला लागली. वेताळ टेकडीच्या पायथ्याही ब्रेक लागताच चाके थांबली. टेकडीवर हवसे, नवसे, गवसे सर्वच फिरायला येत असतात. प्रत्येकाच्या जागाही ठरलेल्या. सुरेश सर्व वैताग पार करून सर्वात उंच भागावर जाऊन बसला. संध्याकाळ झाली होती. आल्हाददायक हवा अंगाला स्पर्शून जात होती. संपूर्ण शहराचे मनमोहक दर्शन येथून व्हायचे. सगळीकडे दिवे लागल्याने शहर प्रकाशात न्हाऊन निघाले होते. इतर वेळेस प्रचंड ट्रॅफिक, आवाज व पोलुशनमुळे वैताग देणारे रस्ते शांत, शिस्तबद्ध भासत होते. मिणमिणते दिवे घेऊन गाड्या ये जा करीत होत्या. वैताग घालविण्यासाठी सुरेशचे हे फेमस ठिकाण होते. येथे कोणीही फुकटचा सल्ला देणार नाही किंवा शहाणपण शिकविणारं नाही. डिस्टर्ब करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Thursday, April 1, 2010

इट्स स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहा!

इंडियन प्रिमियर लिगचे सामने बघताना २० षटकांचा खेळ पूर्ण होण्याअगोदरच 'स्ट्रॅटेजिक टाइमआउट' मध्ये, फलंदाज बाद झाल्याबरोबर किंवा कोणतीही संधी मिळताक्षणी होणाऱ्या जाहिरातींच्या भडिमाराने आपण त्रस्त झाला असणार. अस्सल क्रिकेट बहाद्दर, शौकीन आणि एखाद्या संघाचे समर्थक असणाऱ्या प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे काम मधातच घुसडण्यात आलेल्या या जाहिराती करत असतात.

क्रिकेटच्या व्यावसायिकरणासोबतच खेळास एंटरटेनमेंट इव्हेंट बनवण्याची कास आयोजकांनी हाती घेतली आहे हे जाणत्या चाहत्यांच्या लक्षात आलेच असणार. चार तास खच्चून मनोरंजनासाठी मैदानावरील तडाखेबंद फटकेबाजीसोबतच, प्रेक्षकांच्या दिमतीस चीअरलीडर्स आहेतच. बहारदार फटक्यांनी चाहत्यांना खिळवून ठेवण्याची जबाबदारी क्रिकेटपटूंना देण्यात आली आहे. तर प्रेक्षकांना लयबद्ध हालचालींनी घायाळ करण्याचे काम हे चीअरलीडर्सचे.


महामहीम ललित मोदींच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या या लीग स्पर्धेने मिळकतीची कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन भाबड्या चाहत्यांना अगोदरच अवाक केले आहेत. आयोजक, प्रायोजक, संघमालक, खेळाडू, ब्रॉडकास्टर सगळ्यांना खोऱ्याने पैसा ओढण्याचा एककलमी कार्यक्रम ठरवून देण्यात आलेला आहे. मात्र हे सामने बघण्यासाठी टीव्हीसमोर डोळे फोडणारा किंवा हौसेने मैदानावर जाऊन सामने बघणारा प्रेक्षक यापासून वंचितच, त्याने फक्त खिसा हलका करायचा. हा अजबच न्याय झाला राव नाही का?


२०-२० षटकांच्या सामन्यादरम्यान चौफेर फटकेबाजीच्या आतिषबाजीतच मध्येच डोकावणाऱ्या जाहिरातीही रंग उधळत असतात. ब्रेक मध्ये जाहिरातींचे डोकावणे हक्काचेच झाले आहे, मात्र गडी बाद झाला की... चेंडू हरवला की... कुणास दुखापत झाली की... कधीही घुसडणं जरा अतीच झाली. मग क्रिकेट सामना आणि एखाद्या चॅनेलवरचा हिट चित्रपट पाहण्यात फरक काय? असा प्रश्न आपणांस पडला असणारच. क्रिकेटचे एंटरटेनमेंट इव्हेंटमध्ये झालेल्या रूपांतरातच त्याचे गमक आहे.

'अतुल्य' अभिनेता

मराठी नाट्यसृष्टीतून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारया अतुल कुलकर्णी या गुणी व सर्जनशील अभिनेत्याने अगदी थोड्या कालावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला आहे. हे राम, पेज थ्री, चांदनी बार, दम या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षक व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

तब्बल दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून अभिनयाची पावती मिळवली आहे. अभ्यासू अभिनेता अशी ओळख असलेल्या अतुलला आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका करायला आवडतात. त्यामुळे चाकोरीबाहेरचा अभिनेता अशी त्याची ओळख आहे. अतुलचा जन्म बेळगावचा. त्याचे शिक्षण झाले ते सोलापूरात.

शिक्षणात अतुलची गती साधारणच होती. म्हणजे सांगायचं झालंच तर बारावीला तो दोनदा परीक्षेला बसला आणि त्यानंतर अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाची परीक्षा त्याला तीनदा द्यावी लागली. मग त्यानंतर त्याने आपल्या अंतर्मनाला साद देत आपला कौल असलेल्या कला क्षेत्रात शिक्षण घेण्याचे नक्की केले.
त्यासाठी पुन्हा सोलापूरात आला.

इंग्रजी साहित्य घेऊन त्याने पदवी घेतली. इंग्रजी साह्त्यि वाचनाने त्यांच्या सृजनाला, अभिव्यक्तीस वाट मिळाली अन जाणीवा समृद्ध होत गेल्या. याच काळात तो नाटकांशीही जोडला गेला. सोलापूरच्या नाट्य आराधना या ग्रूपबरोबर काम करायला सुरवात केली. सुरवातीला दोन वर्षे तर पडद्यामागचा कलाकार होता.

नंतर त्याला स्टेजवर येण्याची संधी मिळाली आणि नंतर मिळतच राहिली. आता त्याने या क्षेत्राचा गंभीरपणे विचार सुरू केला आणि त्यासाठी शास्त्रसुद्ध शिक्षण घेण्याची आवश्यकता भासू लागली. मग त्याने दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात' प्रवेश घेतला. तेथे त्याला मार्गदर्शन मिळाले ते नसरूद्दीन शहा, रतन थिय्यम आदी मान्यवरांचे. येथेच त्याच्या गुणवत्तेला पैलू पडले. त्याच्यातला कलाकार बाहेर आला.

एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर त्याने पहिले व्यावसायिक नाटक केले ते देवदास व गांधींजींमधील संघर्ष मांडणारे गांधी विरूद्ध गांधी. यात त्याने गांधीजींची भूमिका केली. अतुलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हे नाटक हिंदी व गुजरातीतही झाले. तेथेही ते कौतुकास पात्र ठरले. त्याच्या भूमिकेला गुजरात सरकारचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर एडससंदर्भात माहिती देणारे 'क्रॉसरोडस तसेच मृच्छकटिकम, रतन थिय्यम दिग्दर्शित 'थंबानालू, गिरीश कर्नाड लिखित 'अंजु मलिगे' ही काही नाटके केली. ही सर्व नाटके वेगळ्या प्रकारची आहेत.

सद्या अतुल गुलजार यांच्या कवितांवर आधारीत 'खराशे' चे प्रयोग करतो आहे. मराठी चित्रपटांमधल्या त्याच्या भूमिकाही वेगळ्या आहेत. 'देवराई' चित्रपटात त्यांनी साकारलेली स्किझोफ्रेनिक पात्राची भूमिका दाद मिळवून गेली. 'चकवा, दहावी फ, वास्तुपूरष, नटरंग हे त्याचे अन्य काही चित्रपट. अतुल खर्‍या अर्थाने ओळखला जाऊ लागला तो हिंदी चित्रपटांमुळे.

कमल हासनच्या 'हे राम' मधील अभ्यंकर या पात्रातील अभिनयानेच त्याने चुणूक दाखवली होती. त्याचे फळही त्याला सहाय्यक अभिनेत्यासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने मिळाले. त्यानंतर मग 'चांदनी बार, पेज थ्री, खाकी, ८८ अँटॉप हिल, सत्ता, दम' या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचेही कौतुक झाले.

शिवाय त्याने काही इतर भाषक म्हणजे इंग्रजी, तेलगू, कन्नड चित्रपटातही काम केले आहे. त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कलाकार हा नेहमी स्वतच्या अभिव्यक्तीबाबत असमाधानी असतो. पूर्णत्वासाठी त्याचा स्वतःशीच संवाद सुरू असतो. आपण रंगविलेल्या पात्रांचा अभ्यास करीत कच्चे दुवे हेरून त्याला पूर्णत्व देतानाच कलेच्या अभिव्यक्तीबाबत विविध प्रयोग करीत असतो.

अतुलला हे सारे तंतोतंग लागू पडते. त्यासाठी त्यांनी रंगभूमीशी आपले नाते आजही कायम ठेवले आहे. अतुल केवळ अभिनेता नाही, तर त्याच्यात एक संवेदनक्षम माणूसही दडला आहे. म्हणून नर्मदा बचाव आंदोलनासंदर्भात विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे यासाठी मेधा पाटकरांनी दिल्लीत आंदोलन केले होते. त्यावेळी तेथेच असणाऱ्या आमीर खान व अतुल कुलकर्णी या कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला होता व त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्यानंतरही तो आपल्या भूमिकेशी ठाम होता.

Sunday, March 28, 2010

बिहारींचा राजकीय वापर अपरिहार्य- रूडी

राजीव प्रताप रूडी हे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व सध्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. बिहारचे प्रतिनिधीत्व करणारे रूडी एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. ते मगध विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापकही होते. मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी युपी व बिहारींविरोधात आंदोलन छेडले आहे. यासंदर्भात रूडी यांच्याशी मनोज पोलादे यांनी केलेली बातचीत.

''महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयाविरुद्धचे आंदोलन थांबवावे. त्यांचे आंदोलन हे व्यक्तीच्या घटनादत्त मूलभूत अधिकारांचा संकोच करणारे आहे. शिवाय घटनेच्या चौकटीस छेद देणारे आहे. यासोबतच बिहारमध्ये राजकारण करणार्या लालू प्रसादांसारख्या नेत्यांनी बेताल वक्तव्ये करून राज यांना चिथावणी देण्याचे प्रकार थांबवावेत''. कारण यांच्या राजकारणात जीव जातो तो मुंबईत काम करणार्या सामान्य श्रमिकांचा, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी वेबदुनियाशी बोलताना व्यक्त केले. त्याचवेळी मुंबईतील युपी व बिहारींचा राजकीय वापर अपरिहार्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.


स्थानिकांच्या न्यूनगंडावर प्रादेशिक पक्षांचे राजकारण

स्थानिकांच्या न्यूनगंडावर प्रादेशिक पक्षांचे राजकारणबिहार व उत्तर प्रदेशात लोकसंख्येच्या प्रमाणात विकास झालेला नाही. विकसित क्षेत्रांकडे रोजगाराच्या शोधात लोंढ्यांचे स्थलांतर ही स्वाभाविक प्रक्रिया आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, की कोणत्याही ठिकाणी बाहेच्यांचे प्रमाण मर्यादेबाहेर झाले, की स्थानिकांमध्ये न्यूनगंड, धास्ती निर्माण होते. असुरक्षिततेची भावना सर्वव्याप्त व्हायला लागते. अस्मितेचे राजकारण करणारे राजकीय पक्ष नेमके स्थानिकांच्या या भावनेस हात घालून परप्रांतीयांपासून तुम्हांस धोका आहे, असे सांगून यातून तुमचे तारणहार आम्हीच असे ठसवून राजकारण करतात. मुंबईत बिहारी व उत्तरप्रदेशातील स्थलांतरीतांची संख्या मोठी असल्याने साहजिक असल्या भाषिक, अस्मितेच्या आंदोलनाचे ते लक्ष्य ठरतात.


स्वतःचे महत्त्व वाढविण्यावर प्रादेशिक पक्षांचा भर

स्वतःचे महत्त्व वाढविण्यावर प्रादेशिक पक्षांचा भररूडींच्या मते प्रादेशिक पक्षांना मर्यादा आहेत. ते म्हणतात, की देशात भारतीय जनता पक्ष व डावे पक्ष हे दोनच राष्ट्रीय पक्ष स्ट्रक्चर्ड पक्ष आहेत. यामध्ये सामान्य कार्यकर्ताही सर्वोच्च पदापर्यंत पोहचू शकतो. इतर राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष हे व्यक्तीआधारीत असून जात, गट भाषा, अस्मिता हे त्यांचे आधार आहेत. यामुळे राज्याचा सर्वांगीण विकासाऐवजी व्यक्तीगत संस्थाने वाढवण्यातच त्यांची शक्ती खर्ची पडते.


बिहारच्या अविकासास कॉंग्रेस, लालू जबाबदार

बिहारच्या अविकासास कॉंग्रेस, लालू जबाबदारपरप्रांतात लोंढे जाण्यास बिहारमधील परिस्थिती कारणीभूत आहे. मग बिहारचा विकास का झाला नाही, असे विचारले असता, यासाठी त्यांनी कॉंग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांना जबाबदार धरले. ‘’बिहारच्या राजकारणावर दृष्टिक्षेप टाकल्यास कॉंग्रेस व राष्ट्रीय जनता दलाकडेच सत्तेची धुरा राहिली आहे. कॉंग्रेस तर विकासाबाबत निष्क्रिय पक्ष म्हणून ख्यातनामच आहे. यानंतर लालूप्रसाद यादवांच्या पंधरा वर्षाच्या राजवटीने बिहारला रसातळाला नेऊन ठेवले. बिहारमधील बेकारी व अविकासासाठी सर्वस्वी त्यांनाच जबाबदार धरता येईल, असे त्यांनी ठासून सांगितले. भाजपचा पाठींबा असलेल्या नितीश कुमार सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळातही बिहारमध्ये फारसे भव्यदिव्य घडले नसल्याकडे बोट दाखविले असता, विकासाची प्रक्रिया ही काही जादूची कांडी नाही की ती फिरवली आणि विकास झाला अशा शब्दांत उत्तर दिले.


बिहारमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता

बिहारमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता पण तरीही बिहारच्या विकासासाठी ठोस प्रयत्न का होताना दिसत नाही, या विषयावर त्यांना बोलते केले असता, ते म्हणाले, की इंडस्ट्री येण्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा भक्कम असाव्या लागतात. रस्त्यांचे जाळे असायला पाहिजे. राजकीय, सामाजिक परिस्थितीही अनुकूल असावी लागते. राज्यात निर्भय व मुक्त वातावरणासोबतच उद्योगांना लागणाऱ्या प्राथमिक सुविधा पुरवल्या तरच इंडस्ट्री विकसित होते. बिहारमध्ये एवढ्यातल्या राजकीय इतिहासावर नजर टाकल्यास नेमके उलट चित्र आहे. त्यातच स्वतंत्र झारखंडच्या निर्मितीनंतर नैसर्गिक खनिज संपत्तीही गेल्याने बिहार पंगू झाल्याचे विश्लेषण ते करतात.


विकासामुळेच महाराष्ट्रात स्थलांतरीतांचे लोंढे

विकासामुळेच महाराष्ट्रात स्थलांतरीतांचे लोंढेमर्यादेबाहेरच्या स्थलांतरीतांच्या संख्येमुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांवर कमालीचा ताण पडत आहे याकडे लक्ष वेधले असता, महाराष्ट्र मुंबईचा सर्वांगीण विकास झाला असून ते लोंढे पेलण्यास सक्षम आहे. शेवटी रोजगार व विकासाची संधी मिळेल तेथे स्थलांतर होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी महाराष्ट्रातील एकंदरीत विकासात स्थलांतरितांचाही हातभार लागत अाहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मात्र, त्याचवेळी मुंबईसारखे शहर देशातील बहुतांश युवकांना रोजगार देत असेल, स्थलांतरीतांच्या लोंढ्यांना सामावून घेत असेल तर केंद्राने मुंबईस विशेष अनुदान द्यायला हवे काय याबाबत प्रश्न विचारला असता ‘केंद्राने यासंदर्भात निर्णय घ्यायला हवा, असे सांगून उत्तर द्यायचे टाळले.


युपी, बिहारींचा राजकीय वापर अपरिहार्य

युपी, बिहारींचा राजकीय वापर अपरिहार्यमहाराष्ट्रात आपले राजकारण वाढविण्यासाठी स्थलांतरीत युपी, बिहारींचा राजकीय ‘बेस’ म्हणून वापर करणे योग्य आहे काय? या प्रश्नास बगल देत ते म्हणाले, की मुंबईत एखाद्या भागात एखादा उमेदवार निवडून येण्याजोगे त्यांचे संख्याबळ निर्माण झाल्यास त्यांच्यातून राजकीय नेतृत्व उदयास येणे स्वाभाविक आहे. राजकीय व सामाजिक संरक्षण मिळावे, हिताची जपणूक व्हावी यासाठी स्थलांतरित लोंढ्यांचा राजकीय बेस म्हणून वापर टाळता येणे कठीण आहे. सर्वच लोकशाही देशात हीच प्रक्रिया आहे. कारण घटनेनुसार देशभरात कोठेही मुक्त संचार करण्याचा, वास्तव्याचा व रोजगार करण्याचा, व संघटनेचा मूलभूत हक्कच आहे. यास कोणी हरकत घेऊ शकत नाही. आणि ते योग्यही नाही, अशी भूमिका ते मांडतात.

Friday, March 26, 2010

सकाळचा चहा

पहाटेच कामास सुरूवात केली. बायको झोपेत असताना कार्यालयासाठी निघणे फारसं रूचत नाही, मात्र उपाय नाही. पहाटेची वेळ तशी प्रसन्न, ताजीतवानी. सगळीकडे नितांत शांतता, या पहाटेच्या कॅनव्हासवर सुर आणि रंग उमटणार ते फक्त पक्षांच्या किलबिलाटाचे आणि सुर्योदयाचे.
सृष्टित पहाटेच्या रंगोत्सवास सुरूवात होतेसरशी स्वत:स कामात गढवून घेणे, यातही एक आनंद असतो. लहानपणापासून वडिलांनी वळण लावलल्यामुळे माझ्या दिवसांस पहाटेपासूनच सुरूवात होते. रात्री लवकर झोपी जाऊन पहाटेच्या प्रहरी निद्राराणीच्या कुशीतून बाहेर पडून सुर्योदयाची किरणे बाहूत घेणे मनास सुखद अनुभव देवून जाते.

निद्राराणीची याबाबत विशेष तक्रार नसते, कारण माझ्या लहानपणापासून तिच्या अंगवळणी पडले आहे. मात्र माझ्या राणीसाठी हे असहनीय असते. रात्रीतली बेधुंदी अजूनही डोळ्यात तरळत असलेल्या राणीस अशावेळी मी हवा असतो. सकाळच्या सारखझोपेतली साखर माझे तिच्यासोबत असण्यानेच घातली जात असते. नाहीतर तिला सकाळचा चहा कडू घातल्यासारखा जाणवतो. मात्र सकाळी अनपेक्षितपणे तिच्यासोबत चहा घेण्याचा योग जुळवून आणून मी तिला सरप्राईस नक्कीच देणार!


राणीस सरप्राईस खूप आवडते. ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे तिच्यासमोर स्वारींच हजर होणे तिला सुखावून जाते. चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहतो आणि डोळ्यात एक चमक, लकाकी. तिला किती आनंद होत असेल हे मोजता येणार नाही, मात्र तिच्या प्रेमवर्षावातून होणार्‍या अनुभूतीतून मी कयास बांधत असतो.