Thursday, April 1, 2010

इट्स स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहा!

इंडियन प्रिमियर लिगचे सामने बघताना २० षटकांचा खेळ पूर्ण होण्याअगोदरच 'स्ट्रॅटेजिक टाइमआउट' मध्ये, फलंदाज बाद झाल्याबरोबर किंवा कोणतीही संधी मिळताक्षणी होणाऱ्या जाहिरातींच्या भडिमाराने आपण त्रस्त झाला असणार. अस्सल क्रिकेट बहाद्दर, शौकीन आणि एखाद्या संघाचे समर्थक असणाऱ्या प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे काम मधातच घुसडण्यात आलेल्या या जाहिराती करत असतात.

क्रिकेटच्या व्यावसायिकरणासोबतच खेळास एंटरटेनमेंट इव्हेंट बनवण्याची कास आयोजकांनी हाती घेतली आहे हे जाणत्या चाहत्यांच्या लक्षात आलेच असणार. चार तास खच्चून मनोरंजनासाठी मैदानावरील तडाखेबंद फटकेबाजीसोबतच, प्रेक्षकांच्या दिमतीस चीअरलीडर्स आहेतच. बहारदार फटक्यांनी चाहत्यांना खिळवून ठेवण्याची जबाबदारी क्रिकेटपटूंना देण्यात आली आहे. तर प्रेक्षकांना लयबद्ध हालचालींनी घायाळ करण्याचे काम हे चीअरलीडर्सचे.


महामहीम ललित मोदींच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या या लीग स्पर्धेने मिळकतीची कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन भाबड्या चाहत्यांना अगोदरच अवाक केले आहेत. आयोजक, प्रायोजक, संघमालक, खेळाडू, ब्रॉडकास्टर सगळ्यांना खोऱ्याने पैसा ओढण्याचा एककलमी कार्यक्रम ठरवून देण्यात आलेला आहे. मात्र हे सामने बघण्यासाठी टीव्हीसमोर डोळे फोडणारा किंवा हौसेने मैदानावर जाऊन सामने बघणारा प्रेक्षक यापासून वंचितच, त्याने फक्त खिसा हलका करायचा. हा अजबच न्याय झाला राव नाही का?


२०-२० षटकांच्या सामन्यादरम्यान चौफेर फटकेबाजीच्या आतिषबाजीतच मध्येच डोकावणाऱ्या जाहिरातीही रंग उधळत असतात. ब्रेक मध्ये जाहिरातींचे डोकावणे हक्काचेच झाले आहे, मात्र गडी बाद झाला की... चेंडू हरवला की... कुणास दुखापत झाली की... कधीही घुसडणं जरा अतीच झाली. मग क्रिकेट सामना आणि एखाद्या चॅनेलवरचा हिट चित्रपट पाहण्यात फरक काय? असा प्रश्न आपणांस पडला असणारच. क्रिकेटचे एंटरटेनमेंट इव्हेंटमध्ये झालेल्या रूपांतरातच त्याचे गमक आहे.

No comments:

Post a Comment