Tuesday, August 16, 2011

भारत आणि 'नंबर एक' मधील अंतर संपवण्यासाठी!

विदेशातील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजी ढेपाळते हा इतिहास आहे. भारतात प्रामुख्याने पाटा खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सराव असल्याने हे घडते. त्यातच लीग क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे तरूण क्रिकेटपटू झटपट क्रिकेटमधून मिळणारी प्रसिद्धी आणि पैशाच्या चक्रात अडकतात. झटपट क्रिकेटमुळे कसोटीसाठी लागणार्‍या तंत्रशुद्धतेत तरूण क्रिकेटपटू पिछाडतात. वेस्ट इंडीजमध्ये वरिष्ठ खेळाडूंच्या अनु‍पस्थितीत हे प्रकर्षाने जाणवले. उद्या कसोटी संघात दावा सांगणारे आपले तरूण क्रिकेटपटू विंडीजसारख्या कमकुवत संघाविरूद्ध एकाही डावांत ३०० धावांचा पल्ला गाठू शकले नाहीत. आणि इंग्लंड दौर्‍यातही वरिष्ठ फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर तरूण खेळाडू खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. त्यांच्याकडे स्विंग होणार्‍या खेळपट्ट्यांवर उसळते चेंडू खेळण्याचे तंत्रच नाही. आणि कसोटीत खेळण्याची कणखर मानसिकताही नाही.

कसोटीत फलंदाजांची खर्‍या अर्थाने 'कसोटी' लागत असते. फलंदाजाचे तंत्र, क्षमता, कौशल्य, आणि प्रदिर्घ खेळी करण्याची मानसिकतेचा कसोटीतच कस लागत असतो. इंग्लंड दौर्‍यात विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर या नियमित सलामी फलंदाजांच्या अनुपस्थितीत द्रविडला सलामीस आणि लक्ष्मनला तिसर्‍या क्रमांकावर खेळावे लागले. परिणामी नवीन स्विंग होणार्‍या मार्‍यात त्यांचा नाहक बळी गेल्याने संघातील तरूण खेळाडूंवर मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी पडली. मात्र, ते भारतासाठी धावा करू शकले नाहीत, प्रतिस्पर्धी संघाने उसळत्या मार्‍याचे आक्रमन केल्याबरोबर त्यांनी शस्त्र खाली टाकून रणांगणातून पाय काढला.

या तरूण क्रिकेटपटूंची टी-२० क्रिकेटमध्ये कामगिरी दृष्ट लागण्याजोगी आहे. देशाअंतर्गत मर्यादित षट्कांच्या सामन्यातही त्यांची कामगिरी आश्वासक वाटते. म्हणूनच त्यांच्याकडे द्रविड, सचिन, लक्ष्मनला पर्याय म्हणून बघण्यात येत आहे. मात्र, त्यांच्यात कसोटी संघात राहण्याचीही कुवत नसल्याचे इंग्लंड दौर्‍यात सिद्ध झाले आहे. भारताकडे सद्यातरी सचिन, द्रविड, लक्ष्मन या त्रिकुटाची जागा घेण्याची क्षमता असलेले फलंदाज नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे भविष्य काय असेल हे सांगणे कठिण आहे. भारताचे टेस्ट साम्राज्य आत्ताच खालसा व्हायच्या उंबरठ्यावर असताना भविष्यात आपण कसोटी क्रिकेटमध्ये कोठे असू हे काळच ठरवेल.

लीग किंवा टी-२० क्रिकेटची लोकप्रियता, आर्थिक उलाढाल आणि मनोरंजन मुल्यं मोठे आहे. यामधून तरूण प्रतिभावान क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळण्यासोबतच चांगला पैसा व प्रसिद्धीही मिळत आहे. हे लक्षात घेता 'झटपट' प्रकाराला दोष देणे योग्य नाही. तर नव्या दमाच्या, उमद्या क्रिकेटपटूंनी स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्यासोबतच आपल्या प्राथमिकता ठरवणे आवश्यक आहे. मला फक्त झटपट क्रिकेट खेळून पैसा कमवायचा आहे की प्रदिर्घ काळासाठी देशासाठी खेळायचे आहे, देशाकडून महत्त्वाच्या दौर्‍यात कसोटी क्रिकेट खेळायचे असल्याने त्याअगोदर विश्रांती घेऊन तंदुरूस्त रहायचे कि 'झटपट' क्रिकेट खेळून दुखापतग्रस्त व्हायचे, हा निर्णय खेळाडूंनीच घ्यायचा आहे.

या तरूण खेळाडूंना देशाकडून कसोटी क्रिकेट खेळायचे असल्यास त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन या प्रकाररासाठी लागणारे फलंदाजी तंत्र विकसित करावे लागेल. यामध्ये सुरूवातीला वेळ द्यावा लागेल मात्र एकदा हे तंत्र विकसित झाल्यानंतर त्यांना 'तिन्ही' प्रकारात खेळायला अडचण जाणार नाही. वेळ व आवश्यकतेनुसार थोडाफार बदल करून ते तिन्ही प्रकारात (टेस्ट, वनडे आणि टी-२०) स्वत:स सिद्ध करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहतील. आणि भारतावर सद्या इंग्लंडमध्ये ओढवलेली नामुष्की पत्करण्याची वेळ येणार नाही.

संघव्यवस्थापनासही क्रिकेटच्या उज्वल भविष्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. संघातील प्रमुख वरिष्ठ फलंदाज किंवा गोलंदाज दुखापतग्रस्त असल्यास त्यांचेजागी खेळण्यास सक्षम दुसरी फळी निर्माण करण्याचे आव्हान त्यांनी स्विकारायला पाहिजे. यासांठी दौर्‍यावर निवड झालेल्या प्रतिभावान खेळाडूंना संघात स्थान देऊन त्यांच्या प्रतिभेस न्याय द्यावा लागेल. तसेच देशातील गुणवत्तापूर्ण प्रतिभा शोधून देशाअंतर्गत मालिका आणि दौर्‍यांमध्ये त्यांना संधी देऊन मजबूत 'दुसरी फळी' उभारावी लागेल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे करू शकते तर आपण का नाही? ऑस्ट्रेलियन क्रिकेट सद्या याच प्रक्रियेतून जात असून त्यांनी दुसरी फळी उभारण्यासाठी धोरणात्मक धाडसी निर्णय घेऊन निकराचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र भारतात निवडकर्त्यांनी आणि नंतर संघव्यवस्थापन व कर्णधाराची मर्जी यातच ही प्रक्रिया अडकली आहे.

भारतातील क्रिकेट प्रशासन अर्थातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळही परदेशातील भारताच्या निराशाजनक कामगिरीस जबाबदार आहे. भारताने ऐंशीच्या दशकातच विश्वविजेतेपद पटकावून जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:स स्थापित केल्यानंतर आणि परदेशात कसोटी मालिका विजय संपादन केल्यानंतर भारतीय क्रिकेट प्रशासनाने भविष्यकालीन वाटचाल लक्षात घेऊन धोरणात्मक आणि धाडसी निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती ओढवली नसती. भारतीय संघ कोणत्याही भूमीवर कोणत्याही संघास धुळ चारण्यास सक्षम राहिला असता आणि खर्‍या अर्थाने टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर एकचा संघ म्हणून आज भारतास मिरवता आले असते. कारण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेस त्यांच्या देशात जाऊन पराभूत केल्याशिवाय भारत खर्‍या अर्थाने नंबर एकचा संघ ठरणार नाही.

यासांठी क्रिकेट प्रशासनास देशभरात वेगवान खेळपट्ट्या बनवाव्या लागतील. यामुळे आपणास दोन-तीन वर्ष नुकसान होईल, मा‍त्र आपली समस्या कायमची सुटेल. रणजी क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी देशात वेगवान खेळपट्टया उपलब्ध केल्यास देशातील नवीन, तरूण प्रतिभा या खेळपट्ट्यांवर तयार होईल आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कोठेच कमी पडणार नाही. भारत खर्‍या अर्थाने सर्वच ठिकाणी वाघासारखा खेळेल, त्यांना शेळ्या बनून खेळावे लागणार नाही. आणि सद्या इंग्लंडमधील संघाच्या कामगिरीने मान झुकली तशी वेळ तमाम भारतीयांवर येणार नाही!

1 comment:

  1. नंबर एकवर असण्यापेक्षा खेळाडू म्हणविणाऱ्यानी प्रतिकूल परिस्थितीतही सरासरी खेळ करावा एवढीच माझी मागणी आहे.

    ReplyDelete