Sunday, August 28, 2011

वतन मे फिजा बदली, शुरूवात नये दौर की..


भ्रष्ट्राचाराविरूद्ध लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी राजधानीत इंडिया गेटवर जनसागर लोटला आहे. 'मै भी अण्णा तु भी अण्णा, अब तो सारा देश है अण्णा' चे नारे देत लोक जनआंदोलनाचा विजय साजरा करत आहेत.

संध्याकाळनंतर येथे जवळपास २५ हजार लोक जमा झाले असून जल्लोषाच्या वातावरणाने परिसर निनादून गेला आहे. लोकशाहीत जनभावना लक्षात घेऊन कायदे बनवले गेले पाहिजे, जनभावनेचा आदर देशकारभार हाकताना राज्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे, लोकशाहीत जनताच सर्वश्रेष्ठ असली पाहिजे, यासाठी जनजागृती आवश्यक असते. हे जीवंत लोकशाहीचे उदाहरण आहे. असल्या अहिंसात्मक जनजागृती करणार्‍या आंदोलनानेच खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक प्रस्थापित होईल आणि लोकशाही अधिक सुदृढ व प्रगल्भ होईल.

अशा तमाम भारतीयांच्या भावना, इच्छा आणि आकांक्षा होत्या, आहेत आणि राहिल. मात्र राज्यकर्ते राजधर्म विसरले म्हणजे लोकशाहीचा गळा घोटल्या जातो, अराजक व अनागोंदीकडे राष्ट्राची वाटचाल सुरू होते आणि जनतेचा हुंकार दडपण्यासाठी दमन, दडपशाही आणि हुकुमशाहीकडे झुकणारी राजवट घट्ट करण्यासाठी शासनकर्त्यांचे हात सरसावतात. भ्रष्ट्राचार सार्वत्रिक होतो आणि लोकांचे हुंकार दडपले जातात. याविरूद्ध देशवासियांच्या मनात असंतोष खदखदत असतो फक्त त्याला असंतोषास दिशा देणारे नेतृत्व आणि व्यासपीठ हवे असते. अण्णांच्या आंदोलनाने ते मिळाले आणि सारा देश रस्त्यावर उतरला आणि त्यानंतर काय झाले ते आपण पाहतच आहोत....

अण्णागिरीने राष्ट्रात नवचैतन्य संचारले असून त्याचेच प्रत्यंतर दिल्ली, मुंबई आणि सार्‍या देशभर निघालेल्या विजय यात्रांमधून येत आहे. देशभर हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या लाखोंच्या जनांच्या प्रवाहातून आता 'नया दौर'ची सुरूवात झाल्याचेच हे घोतक आहे.

No comments:

Post a Comment