Monday, August 29, 2011

अण्णांच्या आंदोलनाने कॉंग्रेसमध्ये भूकंप!


कॉंग्रेसचे खासदार प्रवीण ऐरण यांनी अण्णा हजारे मुद्याप्रकरणी पक्षात चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाने अण्णांच्या आंदोलनाचा मुद्दा योग्य प्रकारे हाताळला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींना बदानाम करण्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी हे कारस्थान केले काय, हे बाहेर यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.


लोकपालप्रश्नी अहिंसक आंदोलन करणारे गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे आंदोलन हाताळताना कॉंग्रेस पक्षाने सुरूवातीपासून शेवटपर्यंत घोडचूका केल्याचे तमाम भारतीयांनी पाहिलेच आहे.

यातून या आंदोलनाबाबत पक्षात एकवाक्यता नाही, पक्षात अंतर्गत मतभेद आहेत, हे स्पष्ट होतच होते. सपुआ सरकारने तमाम भारतीयांच्या भावनांचा अनादर करत अण्णांचे जनआंदोलन दपडशाहीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र त्यात यश न आल्यावर सरकारची पिछेहाट सुरू झाली. यातून सरकारसोबतच कॉंग्रेस पक्षाची नाचक्की झाली. याप्रकरणी पक्ष आणि सरकारमध्ये कधीच एकवाक्यता दिसली नाही.

अण्णांनी उपोषण सोडावे यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत प्रस्ताव मांडून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यास सर्वपक्षीय समर्थन मिळण्यासोबतच संसदेनेही अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र दुसर्‍या दिवशी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आपण 'गेम चेंजर' असल्याचा आभास निर्माण करत लोकपालला घटनात्मक दर्जा असावा, निवडणूक आयोगप्रमाणेच लोकपालही घटनात्मक संस्था असावी, असे वक्तव्य संसदेत करत मुद्यास वेगळेच वळण दिले होते.

यामुळे अण्णांच्या तीन मुद्यांवर संसदेत सहमती निर्माण करण्याच्या प्रयत्नास खीळ बसल्याने अण्णांचे उपोषण सुटण्याऐवजी आणखी पुढे ढकलल्या गेले होते. नंतर प्रकरण शेकणार असल्याचे लक्षात आल्यावर सपुआ सरकारने संसदेत चर्चा करून मुद्यांवर सहमती झाल्याचे सभागृहाचे मत अण्णांना कळवल्यावर तेराव्या दिवशी उपोषण संपले होते. कॉंग्रेसमध्ये अण्णा आंदोलन हाताळण्याबाबत असलेले अंतर्गत मतभेद प्रवीण ऐरन यांच्या मागणीने चव्हाट्यावर आले आहेत.

No comments:

Post a Comment